पिंपरी-चिंचवड शहरात गावकी-भावकीचेचराजकारण ; कधी मिळणार सर्वांना सोबत घेणारा, सर्वमान्य नेता..?

By श्रीनिवास नागे | Updated: June 10, 2025 08:49 IST2025-06-10T08:48:53+5:302025-06-10T08:49:25+5:30

उद्योगनगरीचे नेतृत्व बहुतांशकाळ शहराबाहेरच्या कारभाऱ्यांकडे : स्थानिकांनीच खेचले एकमेकांचे पाय; कायापालट होताना दिसली नवनवी स्थित्यंतरे

pimpari-chinchwad Politics of villager-brother in Pimpri-Chinchwad city; When will we get a universally accepted leader who will take everyone along? | पिंपरी-चिंचवड शहरात गावकी-भावकीचेचराजकारण ; कधी मिळणार सर्वांना सोबत घेणारा, सर्वमान्य नेता..?

पिंपरी-चिंचवड शहरात गावकी-भावकीचेचराजकारण ; कधी मिळणार सर्वांना सोबत घेणारा, सर्वमान्य नेता..?

पिंपरी : गाव ते महानगर अशी वाटचाल राहिलेल्या पिंपरी-चिंचवड शहराचे नेतृत्व गेल्या ५५ वर्षातील बहुतांशकाळ शहराबाहेरच्या नेत्यांकडे राहिले आहे. गेल्या काही वर्षांपासून मात्र शहरातीलच कारभारी लाभले आहेत. प्रत्येकाने आपापल्या क्षमतेनुसार आणि कार्यशैलीने येथील कारभार चालवला असला तरी अनेकांना विरोधाचा सामना करावा लागला. गावकी-भावकीच्या राजकारणातून त्यांना कधी गाववाला, तर कधी बाहेरचा अशा चौकटीत बसवण्यात आले. कधी स्थानिकांनीच एकमेकांचे पाय खेचले. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन जाणारा, सामावून घेणारा सर्वमान्य नेता शहराला मिळालाच नाही.  सधन नगरपालिका, श्रीमंत महापालिका आणि मेट्रो सिटी अशा प्रवासात पिंपरी-चिंचवडचा कायापालट झाला आहे.

प्रशस्त रस्ते, उडाणपूल, हिरव्यागार बागा, टोलेजंग इमारती ही येथील वैशिष्ट्ये आहेत. पायाभूत सुविधांचा विस्तार झाला आहे. त्यामुळे उद्योगनगरीचा नावलौकिक आंतरराष्ट्रीय दर्जाचे राहणीमान असलेले शहर असाही आहे. काही ग्रामपंचायतींची मिळून १९७० मध्ये नगरपालिका बनताना आणि नंतर अण्णासाहेब मगर यांनी नेतृत्व केले. त्यावेळी गावकऱ्यांनी स्वतःच्या जमिनी देऊन विकासकामांना सहकार्य केले. उद्योगनगरीची जडणघडण या काळातच झाली. शहराचे शिल्पकार असा मान असणाऱ्या अण्णासाहेबांचे १९७९ मध्ये खासदार असताना निधन झाले. त्यानंतर काँग्रेसचेच प्रा. रामकृष्ण मोरे खासदार झाले. प्रा. मोरे यांचा शहरात वरचष्मा होता. त्यांच्यानंतर गजानन बाबर आणि श्रीरंग बारणे या खासदारांना पूर्ण शहराचा कारभार हातात ठेवता आला नाही. मात्र बारणे यांनी आमदार महेश लांडगे यांच्यासोबत तो प्रयत्न केला.

नगरपालिकेची महापालिका झाल्यानंतर शहरावर कुणाकुणाचे राहिले वर्चस्व...

नगरपालिकेची महापालिका १९८२ मध्ये झाली. महापालिकेची पहिली निवडणूक १९८६ मध्ये झाली. या दरम्यान सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करताना प्रा. रामकृष्ण मोरे यांनी विकासाच्या वाटेवर जाणारे नियोजन केले.

पुढे १९९१ मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश झाला. तेव्हा अजित पवार खासदार झाले आणि त्यांचा शहराच्या राजकारणात प्रवेश झाला. या काळातच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आयटी पार्कची मुहूर्तमेढ रोवली. शहराच्या विकासात त्यांचा वाटा मोठा आहे. पुढे महत्त्वाकांक्षी राजकारणामुळे अजित पवार आणि प्रा. मोरे यांच्यात शीतयुद्ध रंगू लागले. शहरात दोन सत्ताकेंद्रे तयार झाली. याच काळात शहर विस्तारत होते.

राष्ट्रवादीची स्थापना १९९९ मध्ये झाली. त्यानंतरही शहरातील काँग्रेसजनांनी प्रा. मोरे यांची साथ सोडली नाही. मात्र, अजित पवार यांनी म्होरके हेरून त्यांना पाठबळ दिले. सत्ताधारी पक्षात दोन गट पडले. २००२ मधील महापालिका निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. नोव्हेंबर २००३ मध्ये प्रा. मोरे यांचे निधन झाल्यानंतर अजित पवार यांच्याकडे शहराचे एकहाती नेतृत्व आले. शरद पवार यांनी त्यांच्याकडे पूर्ण जबाबदारी दिली. तेव्हापासून २०१७ पर्यंत अजित पवार यांचे शहरावर वर्चस्व राहिले.

या दरम्यान २०१४ मध्ये पवार यांचा हात सोडून भाजपमध्ये गेलेल्या आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी २०१७मध्ये पवारांच्या गडाला सुरूंग लावला. पाच वर्षे या दोन्ही आमदारांनी शहराचा कारभार चालवला. जगताप यांच्या अकाली निधनानंतर लांडगे यांच्या हातात पालिकेची सत्ता आली. आता जगताप यांच्यानंतर त्यांचे बंधू आमदार शंकर जगताप यांचेही नेतृत्व पुढे आले आहे.

अजितदादांचे दीर्घकाळ वर्चस्व आणि हासही

पिंपरी-चिंचवड शहराने अजित पवार यांचे नेतृत्व दीर्घकाळ स्वीकारले आणि वेळ येताच झुगारूनही दिले. त्यांच्या मुलाचा लोकसभेला पराभव करण्यातही शहराचाच मोठा वाटा राहिला. पवारांची एकाधिकारशाही मान्य करणाऱ्या शहराने त्यांना 'बाहेरचा नेता' म्हणून बाजूलाही सारलो मात्र पयारांमुळे शहराचा कायापालट झाला, हे त्यांचे विरोधकही मान्य करतात. प्रशस्त रस्ते, भलेमोठे उड्डाणपूल, उद्याने, वाहतुकीला शिस्त लावणारे ग्रेड सेपरेटर, विकासाचे मोठे प्रकल्प पवारांमुळेच साकारले गेले. याच काळात पुण्या-मुंबईच्या पंगतीत पिंपरी-चिंचवडही बसू लागले. पुढे पवार यांचे शहरावरील वर्चस्व संपले, ते त्यांच्या कारभान्यांनी पालिकेत केलेल्या कारभारामुळेच.

Web Title: pimpari-chinchwad Politics of villager-brother in Pimpri-Chinchwad city; When will we get a universally accepted leader who will take everyone along?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.