महापालिकेत पुन्हा विरोधी बाकावर : भाजपकडून दुसऱ्यांदा चीतपट; गळलेले मोहरे, आक्रमकेत उशीर, स्थानिक नेत्यांच्या सोयीस्कर गुपचिळीमुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यात अपयश
श्रीनिवास नागे : वरिष्ठ वृत्तसंपादक
पिंपरी : शेवटच्या टप्प्यात हातघाईच्या बनलेल्या पिंपरी-चिंचवडच्या लढाईत भाजपने बाजी मारली. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक राष्ट्रवादीची धुरा सांभाळणाऱ्या अजित पवार यांनी चुरशीची केली; पण भाजपने पळवलेले मोहरे, आक्रमक होण्यात झालेला उशीर, स्थानिक नेत्यांची सोयीस्कर गुपचिळी, मतदारांपर्यंत पोहोचण्यात आलेले अपयश यामुळे पवार यांना पुन्हा ही ‘आवडती महापालिका’ गमवावी लागली.
निवडणूक जाहीर होताच भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी सावध खेळी रचल्या. निवडणुकीत दोन्ही पक्ष जंगी तयारीने उतरल्याचे चित्र तयार झाले. शिवाय मैदानात दोघेच असल्याचे ‘नरेटिव्ह’ तयार करण्यात दोन्ही पक्ष यशस्वी झाले. राजकीय मंचावर ही नेपथ्य मांडणी होत असताना इतर पक्ष खिजगणतीतही नव्हते. त्यातच स्वबळावर सत्ता मिळवायची, जमले नाही तर निकालानंतर एकत्र यायचे किंवा विरोधी बाकावर आपण सांगू त्यांनाच बसवायचे, अशी खेळी भाजपने खेळली.
भाजपने आधीपासूनच कंबर कसली होती. ‘इलेक्टिव्ह मेरिट’ तपासून उमेदवारांची यादी तयार ठेवली होती. एकहाती वर्चस्वासाठी इतर पक्षांतील वजनदार इच्छुक कमळाच्या तंबूत आणले होते. विशेषत: राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेची तुफान फोडाफोडी केली. नऊ वर्षांनी निवडणुका होत असल्याने सगळेच इच्छुक अस्वस्थ होते. त्यातील बहुतेकांनी सत्तेत जाण्याच्या अट्टहासातून बलदंड भाजपमध्ये पटापट उड्या टाकल्या. आयारामांनी आपापली तिकिटं निश्चित केली. मोजक्या निष्ठावानांना थांबवून ‘दबंग’गिरी केली गेली.
दुसरीकडे भाजपने शहराची धुरा शंकर जगताप यांच्याकडे देऊन महेश लांडगे यांना काहीसे बाजूला केले; पण निवडणूक प्रमुख म्हणून जगताप आक्रमक झालेच नाहीत, उलट त्यांचा अतिसंयम भाजपला ‘डिफेन्स मोड’मध्ये घेऊन गेला. यावेळी सर्वांत प्रकर्षाने जाणवला, तो भाजपचा प्रचारातील विस्कळीतपणा. अजित पवार यांच्या तोफगोळ्यांना तोंड देण्यासाठी महेश लांडगे एकटेच मैदानात उतरल्याचे चित्र होते. लांडगेंच्या भाषणात एकेरी भाषा आली, हेच पवार यांना अपेक्षित होते. केवळ लांडगेंना लक्ष्य करून महापालिकेतील कारभारावर प्रहार करण्याचा हेतूच तो होता.
पवार यांच्या चलती दिसू लागताच भाजपला दोन-तीनदा रणनीती बदलावी लागली. शेवटी महेश लांडगे यांना ‘भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचा’ असाही पवित्रा पवारांविरुद्ध घ्यावा लागला. अखेर मुख्यमंत्र्यांसह इतर नेत्यांनी मात्र केवळ विकासाच्या मुद्द्यावर दाखवलेल्या संयमाला मतदारांनी पसंती दिली.
स्थानिक शिलेदारांच्या गुपचिळीचा अजित पवारांना फटका
अजित पवार ताकदीने उतरणार असल्याचे दिसताच इतर पक्षांतून त्यांच्याकडे गेलेल्या सुरुवातीच्या चलाख मंडळींनी आपापल्या जागा ‘फिक्स’ केल्या. ही मंडळी ताकदीने रिंगणात उतरली; पण पवार भाजपच्या सत्ताकाळातील कारभारावर अजित पवार कडाडून हल्ला करत असताना स्थानिक नेते-पदाधिकारी मात्र मूग गिळून गप्प होते. कुणी म्हणते, ही पवारांची चाल होती, तर कोणी म्हणते भाजपला अंगावर घ्यायची त्यांच्यात धमक नव्हती. कारण त्यातील अनेकांचे हात त्यात अडकले होते. अर्थात त्यामुळे पवार यांनी मांडलेले मुद्दे अपेक्षित मतदारांपर्यंत गेलेच नाहीत.
खरे तर भाजपच्या कथित भ्रष्टाचारावर घणाघात करण्यास अजित पवार यांनी उशीर केला. भाजप सरकारमध्ये सहभागी असल्याने ते कचवचत आहेत, असा संदेश शहरभर गेला होता. त्यांनी भाजपच्या स्थानिक कारभाऱ्यांचे वाभाडे काढले खरे; पण तोपर्यंत बराच वेळ गेला होता. २०१७ नंतर पुन्हा एकदा भाजपकडून हार पत्करावी लागली.
महाविकास आघाडीच्या चिंध्या
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेताच महाविकास आघाडीच्या चिंध्या झाल्या. काँग्रेस पराभूत मानसिकतेतून बाहेर आली नाही, कारण ऐन रणांगणात शहराध्यक्षाने राजीनामा दिला. त्यामुळे बाहेरच्या नेत्यांना येऊन पक्ष सांभाळावा लागला. कसेबसे ४७ जागांवर उमेदवार दिले. उद्ववसेनेची तीच गत. त्यांनी मनसेला सोबत घेतले. दोघांनी ६० जागा लढवल्या; पण महाविकास आघाडीची ही मतविभागणी भाजपच्या पथ्यावर पडली.
एकतर्फी वाटणारी लढत अजित पवारांमुळेच चुरशीची
राज्यातील एकमेव पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्वबळावर जिंकण्याची अजित पवार यांना आशा होती. या महापलिकेच्या सत्तेत ते २५ वर्षे होते, त्यातील १५-१७ वर्षे तर त्यांचा एकछत्री अंमल होता. शहराचा विकासात्मक चेहरा बदलण्यात त्यांचा वाटा मोठा आहे. त्यातच राष्ट्रवादी फुटल्यानंतर सगळा तगडा गट त्यांच्याकडेच आला होता. त्यामुळेच ते अलीकडच्या काळात कधी नव्हे ते आक्रमक झाले. भाजपला हादरवून टाकणारे भ्रष्टाचाराचे मुद्दे चव्हाट्यावर आणले. सुरुवातीस एकतर्फी वाटणारी लढत चुरशीची केली; पण अपेक्षित यश पदरी पडले नाही.
‘मैत्रीपूर्ण लढत’ वगैरे काही नसते हो!
निवडणुकीत ‘मैत्रीपूर्ण लढत’ वगैरे काही नसते. असतो तो सरळ सामना! निवडणूक ही निवडणूकच असते. त्यात सगळी आयुधे-शस्त्रे-अस्त्रे वापरावी लागतात. कारण ‘जो जिता वही सिकंदर’, हे अजित पवार यांना पक्के माहीत आहे. त्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या लेखी भासणारी ‘नुरा कुस्ती’ त्यांनी प्रतिष्ठेची केली. शेवटी-शेवटी तर ‘एकमेकांवर जहरी टीका न करण्याचा शब्द अजित पवार यांनी पाळला नाही’, असा पत्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘ओपन’ करावा लागला. फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार यांना ‘बाय’ दिला, अशीही चर्चा झाली; पण ती नुसतीच पारावरची ठरली.
शिंदेसेनेची फरपट; पण गाववाल्यांनी तारले
स्वबळावर लढणार असल्याचे सांगत भाजपने अजित पवार आणि शिंदेसेनेचा हात झिडकारला; मात्र शिंदेसेना युतीबाबत आशाळभूत नजरेने शेवटपर्यंत भाजपकडे पाहत होती. भाजपने जागावाटपाबाबत झुलवत ठेवले. अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी नकाराचा सांगावा धाडला. शिंदेसेनेची भाजपसोबत चर्चा सुरू असल्याने अजित पवार यांनीही त्यांना जमेत धरले नाही. त्यामुळे ‘येईल त्याला तिकीट’, असे करत ५८ जागांवर उमेदवार उभे केले. शहराच्या पश्चिमेकडील गाववाल्या मतदारांनी तारल्यामुळे लक्षणीय जागा मिळाल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरात लक्षच घातले असते तर चित्र आणखी वेगळे दिसले असते.
Web Summary : Despite Ajit Pawar's efforts to make it a close contest, BJP won the PCMC election due to strategic candidate selection, opposition party defections, and focus on development. Local leaders' silence and delayed attacks hurt Pawar.
Web Summary : अजित पवार के प्रयासों के बावजूद, भाजपा ने रणनीतिक उम्मीदवार चयन, विपक्षी दल के दोषों और विकास पर ध्यान केंद्रित करने के कारण पीसीएमसी चुनाव जीता। स्थानीय नेताओं की चुप्पी और देरी से किए गए हमलों से पवार को नुकसान हुआ।