फक्त चहा चुलीवर; वडापाव गाड्यांवर संकटाचे सावट, गॅस मिळत नसल्याने व्यावसायिकांवर आली संक्रांत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 13:15 IST2026-03-26T13:14:01+5:302026-03-26T13:15:23+5:30
गॅसटंचाईमुळे केवळ व्यवसायावरच नव्हे, तर अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर परिणाम होत असल्याचे छोट्या व्यावसायिकांनी सांगितले आहे

फक्त चहा चुलीवर; वडापाव गाड्यांवर संकटाचे सावट, गॅस मिळत नसल्याने व्यावसायिकांवर आली संक्रांत
निगडी: गॅसटंचाईचा फटका सध्या येथील छोट्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांना बसत आहे. सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांसाठी उपलब्ध असलेले वडापाव, मिसळ, कांदा भजी, पोहे आणि मसाला दूध यांसारखे पदार्थ अनेक गाड्यांवरून गायब झाले आहेत. गॅस सिलिंडर उपलब्ध नसणे आणि मिळाल्यास त्याचे वाढलेले दर परवडत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
अनेक विक्रेत्यांनी स्वयंपाक बंद ठेवून चुलीवर केवळ चहाविक्री सुरू ठेवली आहे. एरवी गर्दीने गजबजलेल्या गाड्यांवर आता ओसाडपणा दिसत आहे. रोजच्या कमाईवर कुटुंब चालवणाऱ्या विक्रेत्यांसाठी ही परिस्थिती गंभीर ठरत आहे. पूर्वी वडापावच्या गाड्यांवरून दररोज चांगली उलाढाल होत होती; मात्र सध्या चहावरच व्यवसाय मर्यादित राहिल्याने उत्पन्नात मोठी घट झाली आहे.
गॅसटंचाईमुळे केवळ व्यवसायावरच नव्हे, तर अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर परिणाम होत आहे. लवकरात लवकर गॅसपुरवठा सुरळीत होऊन परिस्थिती पूर्ववत व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पूर्वी दररोज ४०० ते ५०० वडापाव विकले जात होते. त्यावरच घर चालत होते. आता गॅस मिळत नाही आणि मिळाल्यास दर जास्त असतो. चुलीवर मोठ्या प्रमाणात पदार्थ बनवणे शक्य नसल्याने सध्या फक्त चहा विक्री करावी लागत आहे. त्यामुळे उत्पन्न घटले आहे. प्रशासनाने तातडीने गॅसपुरवठा सुरळीत करावा. - भरत गारगोटे (खाद्यपदार्थ विक्रेते, निगडी)