मावळ (पिंपरी-चिंचवड) :पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात इंद्रायणी नदीवरील साकव पूल कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत किमान ४ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात असून, अद्यापही काहीजण बेपत्ता आहेत. एनडीआरएफची टीम घटनास्थळी बचाव कार्यात गुंतली असून, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू आहे. घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकले असून, सर्व स्तरांतून तीव्र शोक व्यक्त केला जात आहे.दरम्यान, या दुर्घटनेत थोडक्यात बचावलेले गणेश पवार यांनी लोकमतशी बोलताना घटनेचा थरारक अनुभव सांगितला. ते म्हणाले,“पूल अचानक कोसळला आणि मीही पाण्यात पडलो. पण कसाबसा बाहेर आलो आणि इतरांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मी थोडक्यात बचावलो.” या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांचा संताप ओसंडून वाहत आहे. कारण, मावळमधील शेलारवाडीजवळील कुंडमळा परिसरातील हा पूल आधीपासूनच धोकादायक स्थितीत होता. पुलाच्या तुटक्या कठड्यांबाबत आणि बाहेर आलेल्या लोखंडी सळ्यांबाबत प्रशासनाला वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. अखेर दुर्लक्षित पूल कोसळला आणि दुर्दैवी घटना घडली.
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
By विश्वास मोरे | Updated: June 15, 2025 19:30 IST