श्री संत तुकाराम महाराज पालखीचा पहिला मुक्काम असणारा इनामदार वाडा १५० वर्षांपूर्वीचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 11:49 IST2025-06-18T11:47:28+5:302025-06-18T11:49:21+5:30
पालखीचा पहिला मुक्काम असलेल्या या इनामदार वाड्याचा समावेश तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात करून त्याचा विकास व्हावा, अशी मागणी

श्री संत तुकाराम महाराज पालखीचा पहिला मुक्काम असणारा इनामदार वाडा १५० वर्षांपूर्वीचा
देहूगाव: श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा पहिला मुक्काम देहूगावातील इनामदार वाडा येथे असतो. या ठिकाणी श्री तुकाराम महाराजांचे तिसरे चिरंजीव व पालखी सोहळ्याचे संस्थापक तपोनिधी नारायण महाराज यांचा जन्म झाला होता. त्यामुळे हा वाडा वारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
मुख्य मंदिराच्या शेजारी असलेला हा ऐतिहासिक वाडा पूर्वी तीन मजली होता आणि इंद्रायणी नदीपर्यंत पसरलेला होता. सध्या अस्तित्वात असलेला वाडा १५० वर्षांपूर्वी विष्णू महाराज गोसावी यांनी बांधला असल्याची माहिती दिलीप गोसावी यांनी दिली. पालखीच्या ऐतिहासिक सुरुवातीपासूनच या वाड्याला एक विशेष आध्यात्मिक स्थान प्राप्त झाले आहे.
पालखी मुक्कामाची तयारी पूर्ण
पालखी प्रस्थानानंतर इनामदार वाड्याच्या मध्यभागी पालखीचा मुक्काम होतो. याआधी पादुकांची शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते विधिवत पूजा होते. या दिवशी वाड्यात आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती असते. वाड्यातील मुक्कामासाठी तात्पुरते पत्राशेड उभारले गेले असून, पावसाच्या स्थितीत साधारणतः २०–२५ वारकऱ्यांनाच मुक्काम करता येतो. जास्त भाविकांना मुक्काम देणे शक्य नाही. वाड्याच्या मध्यभागी पत्राशेडसह कापडी मंडप घालण्यात आले असून, सजावटीसाठी रंगीत झुंबर आणि कमान उभारण्यात आली आहे.
गर्दी नियंत्रणासाठी विशेष बंदोबस्त
वाड्याला केवळ एकच अरुंद दरवाजा असल्याने भाविकांच्या प्रवेश व निर्गमासाठी विशेष व्यवस्था केली आहे. नायलॉन दोरांच्या साहाय्याने रांगेचे नियोजन करण्यात आले आहे, जेणेकरून भाविक एका बाजूने आत येऊन दुसऱ्या बाजूने सहज बाहेर पडू शकतील. पोलिस बंदोबस्त, सीसीटीव्ही निरीक्षण आणि समर्पित सुरक्षाव्यवस्था मंगळवारपासूनच तैनात करण्यात आली आहे. भाविकांची गर्दी वाड्याच्या आत न जमता मोकळ्या जागेत राहावी यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
पालखीचा पहिला मुक्काम असलेल्या या इनामदार वाड्याचा समावेश तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात करून त्याचा विकास व्हावा, अशी आमची मागणी आहे. -दिलीप महाराज गोसावी