हिंजवडी ग्रामपंचायत सरपंच, सदस्यांचा कार्यकाळ संपला;ग्रामपंचायतचा कारभार प्रशासक पाहणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 12:42 IST2026-02-13T12:41:45+5:302026-02-13T12:42:40+5:30
सर्व ग्रामपंचायतींचा कारभार यापुढे, मुळशी पंचायत समितीमध्ये कार्यरत असणारे विस्तार अधिकारी दर्जाचा अधिकारी पाहणार

हिंजवडी ग्रामपंचायत सरपंच, सदस्यांचा कार्यकाळ संपला;ग्रामपंचायतचा कारभार प्रशासक पाहणार
हिंजवडी : ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ अधिकृतरीत्या संपुष्टात आला आहे. त्यामुळे आता हिंजवडीसह परिसरातील ग्रामपंचायतचा कारभार प्रशासक पाहणार आहे.
रविवार (दि. ८) माण हिंजवडी, मारुंजी, जांबे, कासरसाई यांच्यासह नांदे, चांदे, घोटावडे ग्रामपंचायतचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. सर्व ग्रामपंचायतींचा कारभार यापुढे, मुळशी पंचायत समितीमध्ये कार्यरत असणारे, विस्तार अधिकारी दर्जाचा अधिकारी पाहणार आहे. दरम्यान, आयटीनगरी परिसरातील ग्रामपंचायती ह्या, आर्थिक दृष्टीने सदन ग्रामपंचायती आहेत. कररूपी कोट्यवधींचा महसूल ह्या ग्रामपंचायतींना मिळतो. त्यामुळे, गावकारभारी होण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये मोठी चढाओढ पाहायला मिळते.
यंदा, सरपंच थेट जनतेमधून निवडला जाणार असल्याने, माण, हिंजवडी, मारुंजीसह परिसरात ग्रामपंचायत निवडणुका लक्षवेधी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुळशी तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. मात्र, नियोजित बारावी आणि दहावीच्या परीक्षांचा कालावधी असल्याने, होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. मात्र, एप्रिल अथवा मे महिन्यात ग्रामपंचायत निवडणुका होण्याची दाट शक्यता वर्तवली जात असल्याने गावस्तरावरील स्थानिक राजकीय हालचालींना वेग आला आहे. तोपर्यंत, ग्रामपंचायतचा कारभार प्रशासनाच्या हाती असल्यामुळे, आयटी परिसरातील ग्रामस्थांना दैनंदिन सोयी सुविधा पुरवण्याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.