महाराष्ट्र शासनाचा अभिनव उपक्रम : यंदा १० मानाच्या पालखी सोहळ्यांसोबत १०० पेक्षा जास्त रुग्णवाहिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 11:11 IST2025-06-14T11:10:21+5:302025-06-14T11:11:05+5:30
- आषाढी वारीत तत्काळ वैद्यकीय मदतीसाठी अत्यावश्यक सेवा, मोबाइल ॲपद्वारे रुग्णाची अचूक माहिती मिळणार

महाराष्ट्र शासनाचा अभिनव उपक्रम : यंदा १० मानाच्या पालखी सोहळ्यांसोबत १०० पेक्षा जास्त रुग्णवाहिका
- राजेंद्र काळोखे
देहूगाव : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३४० व्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी महाराष्ट्र शासनाने अत्यावश्यक वैद्यकीय सेवा १०८ आरोग्य विभाग विशेष तयारी केली आहे. यंदा राज्यभरातून येणाऱ्या १० मान्यवर पालख्यांसोबत १०० पेक्षा जास्त रुग्णवाहिका आणि कार्डियाक रुग्णवाहिका तैनात करण्यात येणार आहेत.
या आरोग्य सेवेच्या सोबतच वारकऱ्यांसाठी ‘समारिटन (SAMARITAN) म्हणजे चांगले नागरिकत्व’ हे नवं मोबाइल ॲप्लिकेशन सुरू करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून वारकऱ्यांना तत्काळ वैद्यकीय मदत मिळेल आणि रुग्णवाहिका चालकाला रुग्णाची नेमकी जागा त्वरित कळणार आहे, ज्यामुळे वेळेवर उपचार होण्यास मदत होईल. डॉ. प्रियांका जावळे म्हणाल्या, “शंभरपेक्षा जास्त रुग्णवाहिकांमध्ये प्रत्येक वाहिकेत डॉक्टर व चालक तैनात राहणार आहेत. यामध्ये आवश्यक औषधी व उपकरणे उपलब्ध असतील. या रुग्णवाहिका देहू ते पंढरपूर, आळंदी ते पंढरपूर, सासवड ते पंढरपूर आणि राज्यातील इतर मान्यवर पालखीसोबत वारीच्या प्रत्येक टप्प्यावर तैनात राहतील.”
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभाग आणि एसपीईआरओ यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित केलेल्या ‘समारिटन’ ॲप्लिकेशनमुळे वारकऱ्यांना उपचारासाठी तत्काळ मदत मिळण्याची शक्यता वाढणार आहे. या ॲप्लिकेशनला ॲपल स्टोर आणि गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करता येते.
वारकऱ्यांना या ॲपच्या माध्यमातून प्राथमिक उपचाराबाबतही माहिती मिळेल, ज्यामुळे रुग्णवाहिका येईपर्यंत आवश्यक मदत दिली जाऊ शकेल. डॉ. जावळे यांनी या उपक्रमाची माहिती श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्तांना दिली आहे. आरोग्य विभाग आणि संबंधित संस्थांनी वारकऱ्यांना या सुविधांचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले आहे.