‘गोल्डन गर्ल’चं नवं टार्गेट सेट, बिहारच्या राजकारणातील तरुण चेहऱ्याने वेधलं लक्ष, कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 15:17 IST2025-11-21T15:08:40+5:302025-11-21T15:17:38+5:30

Shreyasi Singh : श्रेयसी बिहारची "गोल्डन गर्ल" म्हणून ओळखली जाते.

श्रेयसी सिंह हे बिहारच्या राजकीय आणि क्रीडा जगतातील एक लोकप्रिय नाव आहे, तिने तिच्या प्रतिभेने आणि कठोर परिश्रमाने दोन्ही क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. श्रेयसी बिहारची "गोल्डन गर्ल" म्हणून ओळखली जाते.

आंतरराष्ट्रीय स्तरावर नेमबाजीत भारतासाठी अनेक मोठी पदकं जिंकली आहेत, ज्यामध्ये गोल्ड मेडलचा देखील समावेश आहे. श्रेयसीची ओळख केवळ खेळांपुरती मर्यादित नाही. ती एका प्रतिष्ठित राजकीय कुटुंबातून आली आहे आणि सध्या बिहारच्या राजकारणात एक तरुण आणि सक्रिय चेहरा आहे.

नितीश कुमार यांच्या नवीन एनडीए मंत्रिमंडळात श्रेयसी सिंहचा मंत्री म्हणून समावेश करण्यात आला आहे. नेमबाजीत देशाचं प्रतिनिधित्व केल्यानंतर, ती आता तिच्या तरुण दृष्टिकोनाचा आणि शिक्षणाचा आधार घेत राज्याच्या राजकारणात महत्त्वाची पदं स्वीकारत आहे.

दृढनिश्चय आणि टॅलेंटने श्रेयसीने एकाच वेळी अनेक आघाड्यांवर यश मिळवून एक आदर्श ठेवला आहे. बिहारच्या राजकारणात प्रवेश करून, ती तिच्या आजोबा आणि वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेत आहे.

श्रेयसी सिंहचा जन्म २९ ऑगस्ट १९९१ रोजी झाला. बिहार मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यानंतर लोकांनी श्रेयसीबाबत गुगलवर सर्च केलं. श्रेयसी माजी केंद्रीय मंत्री आणि बिहारमधील ज्येष्ठ राजकारणी दिग्विजय सिंह यांची मुलगी आहे.

श्रेयसी सिंहचं शिक्षण दिल्लीत झालं. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर श्रेयसीने दिल्ली विद्यापीठाच्या हंसराज कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. हंसराज कॉलेजमधून पदवी प्राप्त केल्यानंतर मानव रचना इंटरनॅशनलमधून एमबीए देखील केलं.

२०२० मध्ये भारतीय जनता पक्षात सामील होऊन श्रेयसी सिंहने राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. त्याच वर्षी तिने जमुई विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार विजय प्रकाश यांचा ४१,००० हून अधिक मतांनी पराभव केला.

बिहारमध्ये एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर तिला नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आला. सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांच्यासारख्या प्रमुख नेत्यांसह मंत्रीपदाची शपथ घेतली.

राजकारणात येण्यापूर्वी, श्रेयसी सिंहने नेमबाजीत (डबल ट्रॅप शूटिंग) अनेक आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड केले आहेत. ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतासाठी गोल्ड मेडल जिंकलं. क्रीडा क्षेत्रातील श्रेयसीच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.