तेल न लावताही केस लगेचच ऑईली होतात? वाचा कारण- केस देतात बिघडलेल्या तब्येतीविषयी संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2025 13:31 IST2025-10-03T13:20:00+5:302025-10-03T13:31:09+5:30

केसांच्या बाबतीत तुम्हाला कोणतीही समस्या जाणवत असेल तर त्याचा संबंध थेट तुमच्या आरोग्याशी असताे. त्यामुळे केसांच्या तक्रारी कमी करण्यासाठी वरवरचे उपाय करणं थांबवा आणि त्यामागचं खरं कारण ओळखून योग्य तो इलाज करा असं तज्ज्ञ सुचवतात.

केस आणि तुमचं आरोग्य याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ तज्ज्ञांनी selfcarebysuman या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

यामध्ये त्या सांगत आहेत की काही जणांचे केस तेल न लावताही लगेचच १- २ दिवसांतच ऑईल होतात. यामागचं कारण म्हणजे त्यांच्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडलेले असते. शिवाय त्यांच्या शरीरात व्हिटॅमिन बी ५ देखील कमी प्रमाणात असते. अशा लोकांनी भोपळ्याच्या बिया, अव्हाकॅडो, रताळी जास्त प्रमाणात खायला हवी.

काही लोकांचे केस खूप पातळ होतात आणि हेअर लाईन मागे मागे जाते. याचं कारण म्हणजे त्यांच्या शरीरात बायोटीन कमी प्रमाणात असते. जर शरीरातलं बायोटीन वाढवायचं असेल तर बदाम, रताळी जास्त प्रमाणात खायला हवी.

शरीरात झिंक आणि व्हिटॅमिन डी कमी प्रमाणात असेल तर त्यामुळे डोक्यात कोंडा होतो. तसेच डोक्याच्या त्वचेलाही सतत खाज येते. या दोन घटकांची कमतरता भरून काढायची असेल तर भोपळ्याच्या बिया, काजू आणि हरबरे जास्त प्रमाणात खायला हवे.

केस खूप कोरडे झाले असतील आणि तुटत असतील तर त्यामागचं कारण म्हणजे तुमच्या शरीरात व्हिटॅमिन ए आणि ओमेगा ३ ची कमतरता आहे. ती भरून काढण्यासाठी जवस, गाजर, टोमॅटो, रताळी आणि अक्रोड नियमितपणे खा.

ज्या लोकांचे केस खूप जास्त गळतात त्यांच्या शरीरात प्रोटीन्स आणि लोह कमी प्रमाणात असते. केस गळणं कमी करण्यासाठी त्यांनी प्रोटीन्स आणि लोहयुक्त पदार्थ योग्य प्रमाणात खायला हवे.