taliye landslide : 'आम्ही तुमचं पुनर्वसन करू...' मुख्यमंत्र्यांचा तळीये ग्रामस्थांना धीर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 06:28 PM2021-07-24T18:28:30+5:302021-07-24T19:02:30+5:30

taliye landslide : तळीये ग्रामस्थांना संपूर्ण नुकसान भरपाई दिली जाईल. त्यांचे योग्य पुनर्वसन केले जाईल.जे काही घडले आहे ते आक्रीत आहे. आजकाल पावसाळ्याची सुरुवात सुद्धा चक्रीवादळाने होते, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

अतिवृष्टी, पूर व दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे रायगड जिल्ह्यात हाहाकार माजला आहे. महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथील परिस्थितीची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण गावची पाहणी करून तेथील गावकऱ्यांशी संवाद साधला.

'तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळं तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचं पुनर्वसन करू. सर्वांना मदत दिली जाईल, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी गावकऱ्यांना धीर दिला.

मुख्यमंत्र्यांसोबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री आदिती तटकरे, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री अनिल परब, मिलिंद नार्वेकर, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी उपस्थित होत्या.

मुख्यमंत्री घटनास्थळी येताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना घटनेची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांचं सांत्वन करत त्यांना धीर दिला.

'तळीये ग्रामस्थांना संपूर्ण नुकसान भरपाई दिली जाईल. त्यांचे योग्य पुनर्वसन केले जाईल.जे काही घडले आहे ते आक्रीत आहे. आजकाल पावसाळ्याची सुरुवात सुद्धा चक्रीवादळाने होते, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

ही आपत्ती इतकी मोठी होती की मदतीला पोहोचताना जवानांना आणि बचाव पथकांना अनेक अडचणी आल्या. कारण सगळ्या सामुग्रीनिशी त्यांना बचावकार्य करायचे होते. राज्य शासन आपत्तीचा सामना करण्यासाठी तयार होते. केंद्र सरकारने सुद्धा सहाय्य केले. लष्कर, एनडीआरएफ सर्वांनीच मदत केली आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

याचबरोबर, अशा दुर्घटना पाहता डोंगर उतार आणि कडेकपाऱ्यांत राहणाऱ्या वाड्यावस्त्यांना स्थलांतरित करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.