West Bengal Assembly Elections 2021 : ...तर बंगालमध्येही महाराष्ट्राप्रमाणे आकारास येईल महाआघाडी, असे असेल समीकरण

By बाळकृष्ण परब | Published: April 5, 2021 12:05 PM2021-04-05T12:05:47+5:302021-04-05T12:17:09+5:30

West Bengal Assembly Elections 2021: सध्या देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष हे पश्चिम बंगालकडे लागलेले आहे. येथे दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बँनर्जी यांच्यासमोर भाजपाने कडवे आव्हान उभे केल्याने ही निवडणूक चुरशीची बनली आहे.

सध्या देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष हे पश्चिम बंगालकडे लागलेले आहे. येथे दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बँनर्जी यांच्यासमोर भाजपाने कडवे आव्हान उभे केल्याने ही निवडणूक चुरशीची बनली आहे.

काही दिवसांपूर्वीपर्यंत बंगालमध्ये अटीतटीची निवडणूक झाली तरी ममता बँनर्जीचा तृणमूल काँग्रेस पक्ष सहज बाजी मारेल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र आता भाजपाही मोठा पक्ष ठरू शकतो, असे काही राजकीय विश्लेषक म्हणत आहेत. अशा परिस्थितीत बंगालमध्ये त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आल्यास तिथे वैशिष्ट्यपूर्ण राजकीय समीकरणे जुळून येण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपा यांच्यापैकी कुणीही मोठा पक्ष ठरला, पण बहुमत मिळवण्यास त्यांना अपयश आले तर अशा परिस्थितीत काँग्रेस, डावे आणि इतर स्थानिक पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

सध्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, भाजपा आणि काँग्रेस-डाव्या पक्षांची आघाडी अशी थेट लढत होत असली तरी मुख्य मुकाबला हा तृणमूल विरुद्ध भाजपा असाच आहे. तर काँग्रेस व डावे पक्ष अस्तित्वाची लढाई लढत आहेत.

असे असले तरी भाजपा आणि तृणमूल काँग्रेस या पक्षांचे बहुमत हुकल्यास काँग्रेस आणि डावे पक्ष किंगमेकरच्या स्थितीत पोहोचतील. वैचारिक भूमिकेचा विचार केल्यास या पक्षांची भाजपाऐवजी तृणमूल काँग्रेससोबत अधिक जवळीक आहे. त्यामुळे हे पक्ष बहुमतासाठी तृणमूलला पाठिंबा देऊ शकतात.

पश्चिम बंगालच्या राजकारणात तृणमूल काँग्रेस आणि भाजपा यांच्यात परंपरागत प्रतिस्पर्धी आहे. मात्र काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांची यापूर्वीही आघाडी होती. २००९ ची लोकसभा आणि २०११ च्या विधानसभेत हे पक्ष एकत्र लढले होते. त्यामुळे त्यांना पुन्हा एकत्र येण्यास फार अडचण येणार नाही. तर हिंदुत्ववादी भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी डावे पक्षही मतभेद विसरून अशा सरकारला बाहेरून पाठिंबा देऊ शकतात.

आता असे समीकरण जुळून आल्यास भाजपाला पश्चिम बंगालमध्येही सत्तेच्या जवळ जाऊनही महाराष्ट्राप्रमाणे सत्तेबाहेर राहावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्यातरी बंगालमध्ये स्पष्ट बहुमत मिळवणे हाच भाजपासाठी सत्ता मिळवण्यासाठीचा एकमेव मार्ग आहे...