Sachin Vaze: मुख्यमंत्र्यांच्या खास माणसावर शरद पवार नाराज; गृहमंत्रालयात हस्तक्षेप करत असल्याची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 12:51 PM2021-03-17T12:51:07+5:302021-03-17T12:56:20+5:30

sachin vaze case: शिवसेनेचा एक मंत्री गृहखात्यात हस्तक्षेप करतोय; गृहमंत्री अनिल देशमुखांनी केली शरद पवारांकडे तक्रार

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्थितीत आढळून आलेल्या कारचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) सुरू केला. या तपासातून अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस येत आहेत.

एनआयएच्या तपासामुळे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंच्या अडचणी वाढल्या आहेत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेलं गृहखातं अडचणीत आलं आहे. यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नाराज असल्याचं समजतं.

शिवसेना गृहखात्यात हस्तक्षेप करत असल्याची तक्रार शरद पवारांकडे पोहोचली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही तक्रार पवारांकडे केल्याचं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे.

शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब गृह खात्यात वारंवार हस्तक्षेप करत आहेत. सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस दलातल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परब यांची भेट घेतली. यामध्ये गुन्हे शाखेच्या सहआयुक्तांसह आणखी काही बड्या अधिकाऱ्यांचा समावेश होता, असं वृत्तात म्हटलं आहे.

अनिल परब गृहखात्यात हस्तक्षेप करत आहेत. पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी थेट त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत, अशी तक्रार देशमुख यांनी शरद पवारांकडे केली.

देशमुखांनी केलेल्या तक्रारीमुळे शरद पवार शिवसेनेवर नाराज असल्याचं कळतं. त्यामुळे आता पवार यामध्ये व्यक्तीश: लक्ष घालण्याची शक्यता आहे.

सध्या एनआयएच्या अटकेत असलेले सचिन वाझेंचा शिवसेनेनं बचाव केला आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीदेखील वाझेंची पाठराखण केली आहे. त्यामुळे वाझेंना वाचवण्यासाठी शिवसेना गृहखात्यात हस्तक्षेप करत असल्याची चर्चा आहे.

मुकेश अंबानींच्या घराबाहेर आढळून आलेली कार, यामधील सचिन वाझेंची संशयास्पद भूमिका यामुळे गृहमंत्री अनिल देशमुखांनी राजीनामा द्या, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

विरोधकांनी यावरून सातत्यानं देशमुखांना लक्ष्य केलं आहे. काल पत्रकार परिषदेत शरद पवारांनी यासंदर्भात विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी देशमुख यांची पाठराखण केली.

गृह मंत्रालयानं जबाबदारी उत्तमपणे सांभाळली आहे. चुकीचं काम करणाऱ्या व्यक्तींना उघडं पाडण्याचं काम त्यांनी केलं आहे, असं पवार म्हणाले. एखाद्या एपीआयच्या अटकेचा परिणाम सरकारवर होणार नाही, हेदेखील पवारांनी स्पष्ट केलं.