ठाकरे सरकारशी वारंवार पंगा घेणारे भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्री होणार? घडामोडींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 09:40 AM2021-03-10T09:40:38+5:302021-03-10T09:45:34+5:30

maharashtra governor bhagat singh koshyari in uttarakhand cm race: महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत

त्रिवेंद्र सिंह रावत यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नवा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकांचा सिलसिला सुरू आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं नावदेखील मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहे. कोश्यारी यांनी याआधी उत्तराखंडचं नेतृत्त्व केलं आहे.

भाजप नेतृत्त्वानं उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदासाठी अद्याप कोणाचंही नाव निश्चित केलेलं नाही. त्रिवेंद्र सिंह रावत यांचं मुख्यमंत्रिपद जाण्यामागे कोश्यारी यांचाच हात असल्याची चर्चा उत्तराखंडमधल्या राजकीय वर्तुळात आहे.

कोश्यारी यांचं वय ७८ वर्षे आहे. उत्तराखंडमधील भाजपचे कार्यकर्ते आणि महत्त्वाचे नेते यांच्याशी त्यांचा आजही थेट संबंध आणि संपर्क आहे.

राज्याचं नेतृत्त्व करण्याचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. मात्र वय त्यांच्या विरोधात जाऊ शकतं. त्यामुळे भाजपच्या नेतृत्त्वाच्या निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

भगतसिंह कोश्यारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक मानले जातात. संघाच्या नेत्यांशी त्यांचे उत्तम संबंध आहेत. त्यांना प्रशासकीय कामकाजाचादेखील अनुभव आहे.

भाजपमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेतृत्त्वाकडून सध्या मुख्यमंत्रिपदासाठी वरिष्ठ नेत्याचा विचार केला जात आहे.

जनतेची नस उत्तम ओळखू शकणाऱ्या आणि त्यांच्याशी थेट संपर्क साधू शकणाऱ्या व्यक्तीकडे मुख्यमंत्रिपद सोपवण्याचा नेतृत्त्वाचा विचार आहे. पक्षातील गटबाजी रोखू शकण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीचा शोध सध्या पक्षाकडून सुरू आहे.

उत्तराखंडमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होत आहे. त्रिवेंद्रसिंह रावत यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळातल्या काही सदस्यांची नावं मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहे.

धन सिंह रावत यांच्या नावाचीदेखील मुख्यमंत्रिपदासाठी चर्चा आहे. मात्र धन सिंह हे त्रिवेंद्र सिंह गटाचे मानले जातात. त्यामुळे त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या पसंतीच्या व्यक्तीला मुख्यमंत्रिपद दिल्याचा संदेश जाईल. यामुळे त्रिवेंद्र सिंह विरोधी गट नाराज होईल.

भगतसिंह कोश्यारी ज्येष्ठ आहेत. गटबाजी रोखण्याचं आव्हान ते पेलू शकतात. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री करावं अशी मागणी पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांनी नेतृत्वाकडे केली आहे.