Coronavirus:...आणि मुख्यमंत्री थेट कोरोनाबाधिताच्या घरी पोहोचले; तब्येत, औषधोपचारांबाबत जाणून घेतले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 10:37 PM2021-05-08T22:37:01+5:302021-05-08T23:12:46+5:30

Coronavirus in Uttar Pradesh : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने सध्या देशात धुमाकूळ घातला आहे. देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्येही कोरोनामुळे यंत्रणा कोलमडून पडली आहे. मात्र अशा परिस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एक सकारात्मक पाऊल उचलले आहे. ज्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने सध्या देशात धुमाकूळ घातला आहे. देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्येही कोरोनामुळे यंत्रणा कोलमडून पडली आहे. मात्र अशा परिस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एक सकारात्मक पाऊल उचलले आहे. ज्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोरोनाचा फैलाव झालेल्या भागातील रुग्णांच्या आरोग्यव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आज मुरादाबादच्या दौऱ्यावर गेले होते. तिथे कोविड कमांड सेंटरचा दौरा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अचानक मनोहरपूर गावात पाहणी दौऱ्याचा कार्यक्रम निश्चित केला. अचानक ठरलेल्या कार्यक्रमाची अधिकाऱ्यांवा माहिती नव्हती. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच पळापळ झाली.

त्यानंतर मुख्यमंत्र्याचा ताफा मनोहरपूर गावात पोहोचला. मुख्यमंत्री अचानक गावात आल्याने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी गाडीतून उतरून चालत गावातील वस्त्यांच्या दिशेने प्रयाण केले.

यावेळी चालता चालता मुख्यमंत्र्यांनी घरांसमोर उभे राहून गावकऱ्यांची खुशाली विचारली. औषधे मिळालीत का, कोरोनापासून बचावासाठी उपाय करत आहात का, याबाबत विचारणा केली. तसेच अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या.

तत्पूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इंटिग्रेटेड कोविड कमांड सेंटरचा दौरा केला. त्यानंतर सर्किट हाऊसमध्ये अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेतली. त्यानंतर मुरादाबाद विभागातील अन्य जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबच त्यांनी व्हर्चुअल बैठक घेतली.

दरम्यान, उत्तर प्रदेशमधील कोरोनाची लाट काहीशी ओसरली आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात कोरोनाचे २६ हजार ८४७ नवे रुग्ण सापडले आहेत. तर राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २ लाख ४५ हजार एवढी आहे. गेल्या आठवडाभरात राज्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत सुमारे ६० हजारांनी घट झाली आहे.

एसीपी नवनीत सहगल यांनी सांगितले की, ग्रामीण भागात आरोग्य पथके घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत. आतापर्यंत ४८ लाख ६३ हजार २९८ घरांचे सर्वेक्षण झाले आहे. यादरम्यान ६८ हजार १०९ जणांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. सरकारकडून त्यांना औषधे देण्यात आली आहेत. तसेच यापैकी १२१० जण पॉझिटिव्ह सापडले आहेत.