CWG 2022: राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांचे दावेदार असलेल्या 'या' ५ खेळाडूंनी सर्वांना केले निराश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 03:39 PM2022-08-09T15:39:25+5:302022-08-09T15:43:23+5:30

राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये भारतीय खेळाडूंनी शानदार क्रीडा कौशल्य दाखवून तिरंग्याची शान वाढवली. ११ दिवस चाललेल्या या स्पर्धेचा शेवट सोमवारी झाला. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्य पदकांसह एकूण ६१ पदकांवर देशाचे नाव कोरले. मात्र काही भारतीय खेळाडूंना पदक जिंकण्यात अपयश आले, ज्यांना पदकाचे प्रमुख दावेदार मानले जात होते.

राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय महिला खेळाडूंनी उल्लेखणीय कामगिरी करून अवघ्या जगाचे लक्ष वेधले. भारताच्या महिलांनी बॉक्सिंगमध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूंना चितपट केले. मात्र लवलीना ही भारताची एकमेव अशी महिला बॉक्सर आहे, जिला एकही पदक मिळाले नाही. ऑलिम्पिकमध्ये पदक विजेत्या लवलीनाचा क्वार्टर फायनलमध्ये वेल्सच्या बॉक्सरकडून ३-२ अशा फरकाने पराभव झाला. खेळ सुरू होण्यापूर्वी लवलीना वादात सापडली होती.

या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी विक्रमी पदक जिंकली असली तरी काही खेळाडूंनी तमाम भारतीयांना निराश केले आहे. २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत मनिका बत्राने २ सुवर्ण पदकांसह एकूण ४ पदक जिंकले होते. मात्र यावेळी महिला एकेरी, महिला दुहेरी आणि सांघिक स्पर्धा तसेच मिश्र दुहेरीमध्ये ती उपांत्यपूर्व फेरीत पराभूत होऊन बाहेर झाली. तिला पदकाचे प्रमुख दावेदार मानले जात होते मात्र तिला पदक जिंकण्यात यश आले नाही.

भारतीय खेळाडूंनी राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये सर्वाधिक पदके वेटलिफ्टिंग मधून जिंकली आहेत. भारताला पहिले सुवर्ण देखील वेटलिफ्टिंगमधून मिळाले आहे. मात्र मागील वेळी गोल्ड कोस्टमध्ये सुवर्ण जिंकणाऱ्या पूनम यादवने वेटलिफ्टिंगमध्ये सर्वांना निराश केले. स्नॅचमध्ये ९८ किलो वजन उचलल्यानंतर क्लीन ॲंड जर्कमध्ये पुन्हा एकदा वजन उचलण्यात तिला अपयश आले. त्यामुळे ती पात्रता फेरी गाठण्यामध्ये अपयशी ठरली. लक्षणीय बाब म्हणजे पूनम एकमेव भारतीय खेळाडू अपात्र ठरली आहे.

वर्ल्ड अंडर -१९ चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकल्यानंतर सर्वांना हिमा दासकडून पदकाची अपेक्षा होती. मात्र हिमा दासला भारताच्या खात्यात आणखी एक पदक टाकण्यात अपयश आले. तिने २०१८ च्या आशियाई स्पर्धेत ३ पदके पटकावली होती. मात्र तरीदेखील तिला मोठ्या व्यासपीठावर कमाल करता आली नाही. राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये हिमा दासला २०० मीटरच्या फायनलमध्ये अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले.

सीमा पुनिया २००६ पासून राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सहभागी होत आहे आणि प्रत्येकवेळी तिने पदक पटकावले आहे. मात्र यावेळी तिला काही खास करता आले नाही आणि पदरी निराशा आली. राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये पुनियाला एकही पदक जिंकता आले नाही. तिचा सर्वोत्तम थ्रो केवळ ५५.९२ मीटर होता. अंतिम फेरीत ती पाचव्या क्रमांकावर राहिली.