कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 17:41 IST2025-07-28T17:15:09+5:302025-07-28T17:41:56+5:30

Operation Mahadev: २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममधील बैसरन पठारावर पर्यटकांची गोळ्या घालून हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने अखेर कंठस्नान घातले. यासाठी राबवण्यात आले ऑपरेशन महादेव!

२६ पर्यटकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांवर भारतीय लष्कराने घाव घातला. हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मूसा याला जवानांनी यमसदनी पाठवले. श्रीनगरमधील लिडवास परिसरात लष्कराने ऑपरेशन महादेव राबवले, यात तीन दहशतवादी ठार झाले. महादेव शिखराला लागून असलेल्या भागातच ही मोहीम घेतली गेल्याने याला हे नाव दिलं गेलं. (Operation Mahadev In Kashmir)

लष्कराकडून वेगवेगळ्या मोहिमांना वेगवेगळी नावे दिली जातात. हे नाव कसे ठरवले जाते आणि ऑपरेशनला वेगवेगळी नावे देण्याचा उद्देश काय असतो?

भारतच नाही, तर जगभरातील लष्करी मोहिमांना असे कोडनेम दिले जाते. भारतीय लष्कराने आधी पाकिस्तानातील दहशतवादी तळे उद्ध्वस्त करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर रावबले होते. सध्या ऑपरेशन महादेव सुरू आहे.

लष्करी मोहिमांचे नाव त्या बैठकीत ठरते, ज्या बैठकीमध्ये पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री आणि लष्कराचे मोठे अधिकारी हजर असतात. जर ऑपरेशन खूपच मोठे आणि गोपनीय असेल, तर त्या बैठकीला फक्त मोजकेच लोक असतात.

लष्कराच्या मोहिमांना नाव देण्यामागे कारण असते, रणनीती, लक्ष्य पूर्ण करेपर्यंत गोपनीयता बाळगली जावी. त्याचबरोबर ऑपरेशनच्या नावाचा जवानाचे मनोधैर्य वाढवण्यावरही परिणाम होतो. मोहिमांना त्या घटनांशी संबंधित किवा त्या जागांच्या संदर्भाने नावे दिली जातात.

लष्कराच्या मोहिमांच्या नावातून एक स्पष्ट मेसेज दिलेला असतो. त्या नावातून मोहिमेचे लक्ष्य काय, हे याबद्दलचीही स्पष्टता असते.

उदाहरणार्थ, पहलगाममध्ये पर्यटकांची त्यांच्या पत्नी-मुलांसमोर हत्या केल्या गेल्या. महिला विधवा झाल्या. त्यांचे कुंकू पुसले गेले. त्याचा बदला घेणारी लष्करी मोहीम म्हणून ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले गेले.