‘आधार’संबंधी सरकारने केला महत्त्वपूर्ण नियम, जाणून घ्या नाहीतर होईल ब्लॉक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 09:06 IST2022-11-11T09:03:22+5:302022-11-11T09:06:37+5:30

‘आधार’संबंधी नियमांमध्ये केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. आधार क्रमांक प्राप्त झाल्यानंतर १० वर्षांनी किमान एकदा संबंधित कागदपत्रे अपडेट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने याबाबत गॅझेट अधिसूचना जारी केली आहे. ‘आधार’ची माहिती दर १० वर्षांनी किमान एकदा अपडेट करावी लागणार आहे.
कोणती माहिती अपडेट करावी लागणार?
आधार क्रमांक प्राप्त झाल्यानंतर ज्यांनी एकदाही माहिती अपडेट केलेली नाही, त्यांना ओळख व रहिवासाची माहिती अपडेट करावी लागणार आहे.
यूआयडीएआयने ‘माय आधार’ पोर्टल आणि ॲपमध्ये बदल केले आहेत. या पोर्टलवर अपडेट आधार ही लिंक सुरू करण्यात आली आहे. तेथून आवश्यक कागदपत्रे जोडून माहिती अपडेट करता येईल.
कोणत्याही आधार केंद्रावर जाऊनदेखील माहिती अपडेट करता येईल. नाव आणि फोटो असलेले ओळखीचे प्रमाणपत्र तसेच निवासाचा पुरावा दर्शविणारी कागदपत्रे जोडून ‘आधार’ अपडेट करता येईल.
देशात आतापर्यंत १३४ कोटी आधार क्रमांक जारी करण्यात आलेले आहेत. किती जणांना आधार अपडेट करावा लागेल, याबाबत नेमकी माहिती सरकारने दिलेली नाही.
फसवणुकीचे प्रकार टळतील
सरकारच्या निर्णयामुळे इतर योजनांचा लाभ घेणे सोपे होणार आहे. तसेच फसवणुकीचे प्रकारही कमी करता येईल, असे सरकारचे म्हणणे आहे.