10 ट्रेनच्या माध्यमातून उलगडणार कारगिल युद्धाच्या विजयाची गाथा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 01:33 PM2019-07-15T13:33:38+5:302019-07-15T13:37:53+5:30

कारगिल विजय दिनाला 20 वर्ष पूर्ण होणार असून या दिवसाची आठवण म्हणून रेल्वेकडून 10 विशेष ट्रेन्स देशभरात फिरवल्या जाणार आहेत. या ट्रेनच्या माध्यमातून नवीन पीढीला कारगिल युद्धाची माहिती करुन दिली जाणार आहे.

ट्रेनवर भारतीय जवानांच्या शौर्यगाथेची छायाचित्रे प्रकाशित करण्यात येतील. पहिली ट्रेन दिल्ली-वाराणसी काशी विश्वनाथ एक्सप्रेस ही असेल

कारगिल युद्धामधील आकर्षक छायाचित्रांमधून युद्धाबाबतची माहिती लोकांपर्यंत पोहचविली जाणार आहे. त्यासाठी या 10 ट्रेन्स देशातील प्रत्येक भागात रवाना होणार आहेत. दिल्ली येथून पहिली ट्रेन रवाना केली जाणार आहे.

कारगिल युद्धामध्ये हौतात्म्य आलेल्या जवानांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी दरवर्षी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस म्हणून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 1999 च्या मे महिन्यात कारगिल सीमेजवळ घुसखोरी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर भारताने ऑपरेशन विजय या कारवाईला सुरुवात केली.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून दिल्लीतील राष्ट्रीय स्मारकाजवळ विजयी मशाल प्रज्वलित करण्यात आली. ही मशाल देशातील अनेक शहरात रवाना होऊन 26 जुलै रोजी द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकाजवळ पोहचेल.

रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी याबाबत माहिती दिली आहे की, 10 ट्रेनच्या माध्यमातून कारगिल युद्धाचा इतिहासाची आठवण करुन दिली जाणार आहे.