Sushma Swaraj Death : वक्तृत्व.. नेतृत्व.. कर्तृत्वाचा मिलाफ म्हणजे सुषमा स्वराज!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 12:25 PM2019-08-07T12:25:31+5:302019-08-07T12:32:50+5:30

भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज (67) यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराने निधन झालं आहे. भाजपाच्या धडाडीच्या नेत्या म्हणून सुषमा स्वराज यांची वेगळी ओळख होती.

1977 मध्ये वयाच्या 25व्या वर्षी सुषमा स्वराज हरियाणाच्या कामगार मंत्री झाल्या होत्या. सर्वात कमी वयाच्या कॅबिनेट मंत्री म्हणून त्या कायम स्मरणात राहतील.

1977 ते 1979 दरम्यान समाजकल्याण, कामगार यासारख्या आठ खात्यांची जबाबदारी त्यांनी सक्षमपणे सांभाळली होती. त्यानंतर वयाच्या 27व्या वर्षी त्या जनता पार्टीच्या हरियाणा प्रदेशाध्यक्ष झाल्या होत्या.

राष्ट्रीय स्तरावरील राजकीय पक्षाच्या पहिल्या महिला प्रवक्त्या म्हणूनही सुषमा स्वराज यांची आठवण येईल. त्याशिवाय, पहिल्या महिला मुख्यमंत्री आणि पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या म्हणूनही स्वराज यांच्या नावाची नोंद देशाच्या राजकीय इतिहासात आहे.

देशाच्या परराष्ट्र मंत्री म्हणून इंदिरा गांधी यांनी सर्वप्रथम जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर हे जबाबदारीचं पद भूषवणाऱ्या सुषमा स्वराज दुसऱ्या महिला नेत्या होत्या.

चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत त्या एकूण 11 निवडणुका जिंकल्या. त्या तीन वेळा विधानसभेवर निवडून गेल्या होत्या, तर सात वेळा खासदार म्हणून विजयी झाल्या होत्या.

2000 मध्ये सुषमा स्वराज या राज्यसभेवर निवडून गेल्या आणि अटलींच्या सरकारमध्ये त्या पुन्हा सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या मंत्री बनल्या. त्याचदरम्यान राष्ट्रीय राजकारणात आणि भाजपामध्ये त्यांचा प्रभाव प्रचंड वाढला.

2009मध्ये त्यांना भाजपाकडून पंतप्रधानपदाच्या प्रबळ दावेदार मानलं जाऊ लागलं. परंतु निवडणुकीत पुन्हा काँग्रेसचं सरकार सत्तेवर आलं आणि सुषमा स्वराज यांना विरोधी पक्षनेतेपद मिळालं.

नेतृत्व क्षमतेच्या जोरावर सुषमा स्वराज यांच्याकडे भाजपाच्या दुसऱ्या पिढीतील सर्वात वजनदार नेत्या म्हणून पाहिलं जात होतं. 2014च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विदिशातून विजय मिळवला होता.

सुषमा स्वराज यांची पत आणि भाजपासाठी दिलेलं योगदान लक्षात घेता मोदींनी त्यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयासारखं महत्त्वाचं खातं सोपवलं.

मोदी सरकार-1 दरम्यान परराष्ट्र मंत्री म्हणून सुषमा स्वराज यांनी केलेल्या कामाला तर तोड नव्हती. ट्विटरवरून साद घालणाऱ्या प्रत्येकाला सुषमांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता.

छोट्या छोट्या गोष्टींपासून ते कुलभूषण जाधव आणि गीताच्या सुटकेसाठी मनापासून प्रयत्न केले होते. त्यासाठी देश त्यांचा कायमच कृतज्ञ राहील.

सुषमा स्वराज यांनी 2018मध्ये तब्येतीच्या कारणास्तव 2019ची लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं. त्यानंतरही त्यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाचं खात कायम होतं.