By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 17:41 IST
1 / 10जेव्हा आयुष्याने अत्यंत कठीण परिस्थिती उभी केली, तेव्हा एका बापाने आणि मुलाने हार मानली नाही. आर्थिक आव्हानं मोठी होती, पण स्वप्नांपुढे मेहनत आणि जिद्दही तशीच होती. 2 / 10शिक्षणासाठी पैशांची गरज भासली, तेव्हा वडिलांनी आपली वडिलोपार्जित जमीन विकून फी भरली. संघर्षाच्या बेड्या तोडून पुढे जाणाऱ्या नूरुल हसन यांनी जेव्हा IPS पद मिळवले, तेव्हा त्यांच्या वडिलांची मान अभिमानाने उंचावली. 3 / 10नूरुल हसन यांनी अधिकारी बनून संपूर्ण कुटुंबाचा गौरव वाढवला. त्यांची ही यशोगाथा आज त्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे, जे संकटांवर मात करून पुढे जात आहेत.4 / 10एका मुलाखतीत नूरुल हसन सांगतात की, ते मूळचे उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथील एका छोट्या गावचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील शेती करायचे, आई गृहिणी आहे आणि त्यांना दोन लहान भाऊ आहेत. 5 / 10कुटुंबाची परिस्थिती इतकी बेताची होती की उदरनिर्वाह करणे कठीण होते. त्यांचे बालपण गरिबीत गेले. काही वर्षांनी त्यांच्या वडिलांना नोकरी मिळाली आणि ते बरेलीला आले. तिथे ते एका झोपडपट्टीत राहायचे.6 / 10गावातून प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी १२ वीसाठी बरेलीच्या मनोहरलाल भूषण कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांना बी.टेक करायचे होते, पण कोचिंग क्लासच्या फीसाठी पैसे नव्हते. अशा वेळी त्यांच्या वडिलांनी गावची जमीन विकून त्यांची फी भरली.7 / 10नूरुल यांनी जिद्दीने अभ्यास केला आणि त्यांची निवड अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये (AMU) बी.टेकसाठी झाली. बी.टेक पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एका कंपनीत नोकरी केली.8 / 10पगारात गरजा पूर्ण होणं कठीण होतं. त्यामुळे त्यांनी 'भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर'ची (BARC) परीक्षा दिली. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांची मुंबईत सायंटिस्ट म्हणून निवड झाली.9 / 10सायंटिस्ट म्हणून काम करत असतानाच त्यांचा ओढा नागरी सेवांकडे वळला आणि त्यांनी UPSC ची तयारी सुरू केली. पहिल्या प्रयत्नात अपयश आलं, तरीही ते थांबले नाहीत. दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी पूर्व आणि मुख्य परीक्षेत यश मिळवलं, पण मुलाखतीत त्यांची निवड होऊ शकली नाही.10 / 10सततच्या अपयशाने खचून न जाता नूरुल प्रयत्न करत राहिले. अखेर २०१५ मध्ये, तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी घवघवीत यश संपादन केले. ज्या मुलाच्या शिक्षणासाठी वडिलांनी जमीन विकली होती, त्याच मुलाने आज आपल्या कुटुंबाचे नाव उज्ज्वल केलं आहे.