पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 13:16 IST2025-05-18T13:13:27+5:302025-05-18T13:16:28+5:30

१९७४ च्या १८ मे रोजी घडलेली महत्त्वाची घटना भारताच्या इतिहासात नोंद झाली. या घटनेमुळे भारत अण्वस्त्रधारी देशांच्या यादीत समाविष्ट झाला. भारताने आजच्या दिवशीच पोखरणमध्ये भूमिगत अण्वस्त्र चाचणी केली होती. या चाचणीला स्माइलिंग बुद्धा असं नाव देण्यात आले होते.

ही पहिलीच वेळ होती जेव्हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ५ स्थायी सदस्य देशांशिवाय अन्य एका देशाने अण्वस्त्र चाचणी घेण्याचं धाडस केले होते. भारताच्या जमिनीवर घडलेल्या या स्फोटामुळे अमेरिका हादरली होती. भारताने अण्वस्त्र चाचणी यशस्वी करून नवा इतिहास रचला होता.

१८ मे रोजी अण्वस्त्र चाचणीची पूर्ण तयारी झाली होती. स्फोटावर नजर ठेवण्यासाठी ५ किमी लांब मचान बनवण्यात आली होती. या मचानवरून सर्व मोठे सैन्य अधिकारी आणि वैज्ञानिक नजर ठेवून होते. अखेर तपासणीसाठी वीरेंद्र सेठी यांना चाचणीच्या स्थळी पाठवण्याचे निश्चित झाले.

तपासणीनंतर चाचणी स्थळावर जीप स्टार्ट झाली नाही. सकाळी ८ वाजता स्फोट होणार होता. वेळ निघून जात होती. जीप स्टार्ट न झाल्याने वीरेंद्र सेठी २ किमी पायपीट करत कंट्रोल रूमला पोहचले. हा घटनाक्रम पाहता चाचणीची वेळ ५ मिनिटे आणखी वाढवण्यात आली होती.

७५ वैज्ञानिक आणि इंजिनिअर टीमने १९६७ सालापासून १९७४ पर्यंत ७ वर्ष मेहनत घेतली होती. या प्रोजेक्टची कमान भाभा एटॉमिक रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. राजा रमन्ना होते. रमन्ना यांच्या टीममध्ये तेव्हा एपीजे अब्दुल कलामही होते. ज्यांनी १९९८ साली अण्वस्त्र चाचणीचं नेतृत्व केले होते.

१९७२ मध्ये भाभा एटॉमिक रिसर्च सेंटरच्या दौऱ्यावेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वैज्ञानिकांना अण्वस्त्र चाचणीसाठी लागणारी तयारी करण्याची परवानगी दिली होती. परंतु इंदिरा गांधी यांची ही परवानगी मौखिक होती. चाचणीच्या दिवसापर्यंत हे संपूर्ण ऑपरेशन गोपनीय ठेवले होते. अमेरिकेलाही याची भनक लागू दिली नाही.

भारताच्या अण्वस्त्र चाचणीमुळे नाराज अमेरिकेने अण्वस्त्र साहित्य आणि इंधनासह अनेक प्रकारचे निर्बंध लावले. त्यावेळी सोवियत रूसने भारताला साथ दिली. ही चाचणी इतकी गुप्तपणे घेण्यात आली ज्याची माहिती अमेरिकेसह कुठल्याही पाश्चिमात्य देशांना मिळाली नाही.

या परीक्षणानंतर भारताला अण्वस्त्र शक्ती म्हणून मान्यता मिळाली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी याला शांतीपूर्ण अण्वस्त्र स्फोट म्हटलं होते. या चाचणीनंतर भारताला अण्वस्त्र उत्पादनात मदत आणि आवश्यकत तंत्रज्ञानासाठी मदत मिळाली.