Joshimath Landslide Photo's: अख्खा जोशीमठ जमीन गिळंकृत करणार? घर, रस्ते, अंगणात मोठमोठे तडे; भयावह फोटो...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 03:52 PM2023-01-07T15:52:13+5:302023-01-07T16:01:06+5:30

पवित्र बद्रीनाथ धामपासून केवळ ४५ किमीवर असलेल्या या जोशीमठ परिसराने अवघ्या देशभरात खळबळ उडवून दिली आहे.

उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये भूस्खलन होऊ लागले आहे. घरे, रस्ते, अंगणात जमिनीला मोठ मोठाले तडे जाऊ लागले आहेत. पवित्र बद्रीनाथ धामपासून केवळ ४५ किमीवर असलेल्या या जोशीमठ परिसराने अवघ्या देशभरात खळबळ उडवून दिली आहे.

जोशीमठाच्या अनेक भागात भूस्खलन, घराच्या भिंती, जमिनीला तडे गेले आहेत. या दहशतीखाली लोक जगत आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी तातडीने जोशीमठाचा दौरा केला असून सध्या ते तिथेच पाहणी करत आहेत.

जमीन खचल्याने माउंट व्ह्यू आणि मल्लारी हॉटेल एकमेकांवर आदळले आहेत. या हॉटेल्सच्या पाठीमागील भागातील अनेक घरांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.

जोशीमठ हे आमच्यासाठी महत्त्वाचे आणि सांस्कृतिक ठिकाण असल्याचे धामी यांनी भेट दिल्यानंतर सांगितले. सर्वांना वाचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. याची कारणे शोधण्याचा तज्ज्ञांचा प्रयत्न आहे. आम्ही लोकांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत, असे ते म्हणाले.

जोशीमठमध्ये ज्या गतीने विकास केला जात आहे, तो अनेक वर्षांपासून समस्यांचे कारण बनला आहे. 1946 मध्ये प्रसिद्ध भूवैज्ञानिक ऑगस्टो गान्सर यांनी आपल्या संशोधनात जोशीमठ हे भूस्खलनाच्या ढिगाऱ्यावर वसलेले शहर असल्याचे म्हटले होते.

जोशीमठच्या पृष्ठभागावर खडक कमी आणि माती जास्त असून पाण्याचे खराब व्यवस्थापन, गटार व्यवस्थापन यामुळे तेथून पाणी मुरते. त्यामुळे जोशीमठचा पाया कमकुवत झाला आहे, असे संशोधक आणि प्राध्यापक यशपाल सुंदरियाल यांनी सांगितले.

एनटीपीसीच्या विष्णू गरूड प्रकल्पांतर्गत बोगद्यात होत असलेले स्फोट इतके शक्तिशाली आहेत की ते कृत्रिम भूकंप घडवून आणत आहेत, असे ते म्हणाले. जोशीमठ हे उतारावर वसलेले शहर आहे आणि उत्तराखंडमधील बहुतांश भाग उतारावर किंवा भूस्खलनाच्या ढिगाऱ्यावर वसलेले आहेत. यामुळे जर त्यांच्या मुळात भेगा पडल्या तर भूस्खलन होण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही, असे ते म्हणाले.

जोशीमठमधील अनेक घरे आता उध्वस्त झाली आहेत. रस्त्यांना धोकादायक तडे गेले आहेत. या भेगांमुळे भगवती मंदिरही कोसळले आहे. घरांचे छत कोसळण्याची शक्यता असल्याने कडाक्याच्या थंडीत लोक घराबाहेर राहू लागले आहेत.

पूर्वीच्या सुरक्षित ठिकाणी नवीन भेगा दिसू लागल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे, तर काही हॉटेल झुकली आहेत. काही ठिकाणी जमिनीतून पाणी बाहेर येत आहे. जमिनीतून बाहेर पडणारे पाणी हे चिंतेचे कारण बनले आहे.

बाधित कुटुंबांचे स्थलांतर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एनटीपीसी आणि एचसीसी कंपन्यांना खबरदारीचा उपाय म्हणून २-२ हजार प्री-फॅब्रिकेटेड घरे आगाऊ तयार करण्याचे आदेश दिले आहेत.