भारतात कोणत्या राज्यात किती होते पाकिस्तानी नागरिक? समोर आली आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 16:57 IST2025-04-29T16:45:57+5:302025-04-29T16:57:46+5:30

२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारताने पाकिस्तानविरुद्ध काही मोठी राजनैतिक पावले उचलली. त्यापैकी एक म्हणजे भारताने पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व अल्पकालीन व्हिसा रद्द केले.

पहलगामच्या बैसरन व्हॅलीवर झालेल्या या हल्ल्यात दहशतवाद्यांनी २६ निष्पाप पर्यटकांना गोळ्या घालून ठार मारले. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्री आणि प्रशासकांना अल्पकालीन व्हिसावर राहणाऱ्या पाकिस्तानींचा शोध घेण्याचे आणि त्यांना २९ एप्रिलपर्यंत हद्दपार करण्याचे निर्देश दिले होते.

२४ एप्रिलपासून अटारी-वाघा सीमेवरून ९ राजनयिक आणि अधिकाऱ्यांसह एकूण ५३७ पाकिस्तानी नागरिक त्यांच्या देशात परतले आहेत. ज्यांना हद्दपार केले जात आहे ते सर्व कायदेशीररित्या भारतात आले आहेत. भारत परदेशी नागरिकांसाठी अनेक श्रेणींमध्ये अल्पकालीन व्हिसा जारी करतो.

सार्क व्हिसा, बिझनेस व्हिसा, व्हिजिटर व्हिसा, जर्नलिस्ट व्हिसा, कॉन्फ्रेन्स व्हिसा, ट्रांजिस्ट व्हिसा, ग्रुप टूरिस्ट व्हिसा, माऊंटेनियरिंग व्हिसा, फिल्म व्हिसा, स्टूडेंट व्हिसा, तीर्थयात्री व्हिसा या श्रेणींमध्ये अल्पकालीन व्हिसा जारी करण्यात येतात.

या व्हिसा श्रेणींअंतर्गत पाकिस्तानी नागरिकांनी भारतात कायदेशीररित्या प्रवेश केला होता आणि त्यामुळे त्यांची माहिती केंद्र तसेच प्रत्येक राज्य सरकारकडे उपलब्ध होती. ज्यामुळे त्यांना शोध घेणे आणि त्यांना परत पाठवणे सोपे झालं.

भारत सरकारचा निर्देश फक्त अल्पकालीन व्हिसावर देशात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना हद्दपार करण्याचा आहे, दीर्घकालीन व्हिसा असलेल्यांना नाही. भारतीय नागरिकांशी विवाह करणाऱ्यांना दीर्घकालीन व्हिसा दिला जातो. त्याच वेळी, केंद्राने पाकिस्तानातून भारतात आलेल्या आणि एलटीव्ही असलेल्या हिंदूंना हद्दपारीपासून सूट दिली आहे.

सरकारच्या या निर्णयानंतर, सर्व राज्यांनी त्यांच्या राज्यात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. इंटेलिजेंस ब्युरोच्या मदतीने, राज्यांच्या स्थानिक गुप्तचर संस्थांनी अल्पकालीन व्हिसा घेतलेल्या पाकिस्तानी नागरिकांना शोधून त्यांना हद्दपार करण्यास सुरुवात केली आहे.

या कामात उत्तर प्रदेश आघाडीवर आहे. राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याची प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली आहे. उत्तर प्रदेश सरकारने अल्पकालीन व्हिसावर राज्यात आलेल्या ११८ पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवली होती.

महाराष्ट्रात अल्पकालीन व्हिसावर राहणाऱ्या ५५ ​​पाकिस्तानी नागरिकांना परतण्यास सांगण्यात आले आहे. मुंबईतून १५ पाकिस्तानी नागरिकांनाही हद्दपार करण्यात आले आहे. मध्य प्रदेशात अल्पकालीन व्हिसावर राहणाऱ्या २२८ पाकिस्तानी नागरिकांना परतण्यास सांगितले. गुजरात सरकारच्या गृह विभागानुसार, सध्या ४३८ पाकिस्तानी नागरिक दीर्घकालीन व्हिसावर गुजरातमध्ये राहत आहेत, ज्यांना सध्या हद्दपार करण्याचे निर्देश देण्यात आलेले नाहीत.

दक्षिण भारतामध्ये सुमारे ६०० पाकिस्तानी नागरिकांचा शोध घेण्यात आला. त्यापैकी काहींकडे दीर्घकालीन व्हिसा तर काहींकडे अल्पकालीन व्हिसा आहे. केंद्राच्या सूचनांनुसार, कर्नाटक सरकारने राज्यात राहणाऱ्या १०८ पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवली. केरळमध्ये १०२ पाकिस्तानी आहेत आणि त्यापैकी जवळजवळ निम्मे लोक उपचारांसाठी वैद्यकीय व्हिसावर आहेत.

तामिळनाडूमध्येही सुमारे १८०-२०० पाकिस्तानी नागरिक अल्पकालीन व्हिसावर आहेत आणि राज्य सरकारने त्यांना तात्काळ देश सोडण्यास सांगितले आहे. त्यापैकी बहुतेक जण वैद्यकीय व्हिसावर राज्यात आले आहेत. अनेक पाकिस्तानी नागरिक चेन्नई आणि वेल्लोरच्या रुग्णालयात उपचारासाठी येतात आणि ते येथे २-३ महिने राहतात.