By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 15:41 IST
1 / 10भारत आणि चीनदरम्यान प्रत्यक्ष सीमारेषेवर सुरु असलेल्या तणावामुळे देशभरात संतापाचे वातावरण आहे. यामुळे भारतीय नागरिकांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहिम उघडली आहे. तर शाओमी, ओप्पो सारख्या ब्रँडना धमक्या मिळू लागल्या आहेत. 2 / 10भारतीय जवानांवरील हल्ल्यामुळे प्रत्येक नागरिकाचे रक्त खवळून उठले असून भारत सरकारही चीनला संधी मिळेल तिथे धडा शिकविण्याच्या प्रयत्नात आहे. चीनच्या आर्थिक नाड्या आवळल्यास मुजोर ड्रॅगन नांगी टाकू शकतो. यामुळे चीनविरोधात आता कस्टम विभागाने मोठी आघाडी उघडली आहे. 3 / 10चीनची उत्पादने असलेले कंटेनर देशातील बंदरे आणि विमानतळांवर रोखण्यात येत आहेत. तपासणी केल्याशिवाय सोडली जात नाहीएत. काही ठिकाणी तर केवळ औषधांचेच कंटेनर सोडले जात आहेत. यासाठी कस्टम विभागाला कोणताही तोंडी किंवा लिखित आदेश देण्यात आलेला नाहीय. 4 / 10एका अधिकाऱ्याने सांगितले की, गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या सूचनेनुसार चीनच्या साहित्याची तपासणी केली जात असेल. कस्टम विभागाने तपासणी कडक केल्याने बंदरावर मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक साहित्याचे कंटेनर पडून आहेत. 5 / 10विमानतळांवरही चिनी सामानाचे बॉक्स मोठ्या प्रमाणावर पडून आहेत. एवढेच नाही तर फेडेक्स आणि डीएचएलसारख्या मालवाहतूक कंपन्या बुधवारपासून नवीन ऑर्डर घेत नाहीएत. मुंबईतील न्हावाशेवा बंदरावरही चीनचे कंटेनर रोखण्यात आले आहेत, असे समजते. 6 / 10याचा चीनच्या स्मार्टफोन पुरवठ्यावरही मोठा परिणाम होणार आहे. नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. कारण भारतीय बाजारात अॅपल आणि सॅमसंग हे दोनच पर्याय सध्या चीनच्या कंपन्यांना आहेत. भारताची जवळपास 71 टक्के बाजारपेठ चिनी कंपन्यांनी ताब्यात घेतलेली आहे. 7 / 10कस्टम विभागाने चीनहून येणारा प्रत्येक कंटेनर बारकाईने तपासण्याचे धोरण स्वीकारले आहे. यामुळे स्मार्टफोन्स, टॅबलेट्स, काँप्यूटर्स आणि टेलिव्हिजन सेटच्या पुरवठ्य़ावर गंभीर परिणाम होणार आहे. या उपकरणांची मागणी वाढलेली असताना कस्टम विभागाने कडक पाऊल उचलले आहे. 8 / 10आधी चीनवरून येणाऱ्या मालाचे कंटेनर खूप जलदगतीने तपासले जात होते. त्यांना परवानगी दिली जात होती. मात्र, आता कसून तपासणी केली जात असल्याने वेळ लागत आहे. शिवाय अनेक कंटेनरमध्ये त्रुटी आढळल्यास ते रोखले जात आहेत. एका मोठा चायनिज कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, यामुळे मेक इन इंडिया कार्यक्रमालाही फटका बसत आहे. 9 / 10कारण बऱ्याच कंपन्या भारतातच मोबाईल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनवत असल्या तरीही त्यांना लागणारे सुटे भाग हे चीनवरूनच मागविले जातात. चीन हा भारताचा मोठा पुरवठादार आहे. मोबाईल आणि टेलिव्हिजनसाठी 65 ते 70 टक्के भाग हे चीन पुरवितो. ते भारतात आणून जोडले जातात. वॉशिंग मशीनचे 25 टक्के भाग हे चीनहून येतात. 40 टक्के लाईट या चीनहून येतात. 10 / 10भारतात उपलब्ध असलेले लॅपटॉप, फोन, एसी आणि खेळण्यांसह अन्य भागही चीनमधून आयात केले जातात. यामुळे कस्टमने हे कंटेनर रोखले तर त्याचा तुटवडा जाणवेल आणि हे भाग महाग होण्याची शक्यता आहे.