Coronavirus Outbreak: कोरोनाचा उद्रेक! मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; भारतात मास्क बंधनकारक करणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 02:48 PM2022-12-21T14:48:17+5:302022-12-21T14:55:28+5:30

Coronavirus Outbreak: चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने भारतासह अन्य देशांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे.

Coronavirus Outbreak: कोरोनाचे उगम स्थान मानल्या जाणाऱ्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोके वर काढले आहे. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. चीनमधील कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले असून रुग्णालयात खाटा आणि औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे.

चीनमधील बीजिंग, शांघाय, वुहान, ग्वांगझाऊ, झेंगझोऊ, चोंगकिंग आणि चेंगडू या शहरांमध्ये परिस्थिती अधिक भयावह होत आहे. कोरोनाची वाढती संख्या पाहता चीनमध्ये कोरोनामुळे मृतांचा आकडा लाखांवर जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

चीनमधील वाढती रुग्णसंख्या जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे. चीनसह ब्राझीलमध्येही कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढल्याचे म्हटले जात आहे. कोरोना प्रादुर्भावाचा वेग पाहता भारत सरकार अलर्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतात उद्रेक होऊ नये, यासाठी केंद्र सरकारकडून खबरदारीचा उपाय म्हणून पावले उचलण्यास सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. केंद्रीय स्तरावर बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक, भारत अलर्ट मोडवर असून, नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन भारती पवार यांनी केले आहे.

चीनमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर चीनमधून येणारे प्रवासी, पर्यटक यांच्याबाबत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. याशिवाय भारतात मास्क बंधनकारक करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भारतात दोन वर्षापूर्वी कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता, त्यातच अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. जीवघेण्या महामारीने संपूर्ण देश ठप्प झाला होता. चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तसेच चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने इतर देशांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.

कोरोनासारखी गंभीर परिस्थिती वेशीवरच थोपवण्यासाठी केंद्राच्या वरिष्ठ पातळीवर बैठका घेतल्या जात आहेत. जगात आठवडाभरातच कोरोनाची ३६ लाख रुग्णांची आकडेवारी समोर आली आहे. चीनमध्ये कोरोना संसर्ग वाढल्याने भारताकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

भारतात कोरोना लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. भारताने २२० कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केल्याची माहिती भारती पवार यांनी दिली. दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी भाष्य केले आहे.

चीनमधील कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याच्या बातम्या चिंताजनक आहेत. परंतु आपले उत्कृष्ट लसीकरण मोहीम आणि ट्रॅक रेकॉर्ड पाहता घाबरण्याची गरज नाही. भारत सरकार आणि आरोग्य मंत्रालयाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांवर आपण विश्वास ठेवून त्यांचे पालन केले पाहिजे, असे ट्विट अदर पूनावाला यांनी केले आहे.

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीसोबत तयार केलेल्या कोरोना लसीला भारतात जानेवारी २०२१ मध्ये आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली. भारतासह अन्य देशांसाठीही सीरमने लसी पाठवल्या होत्या. सीरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वांत मोठी लस उत्पादक कंपनी ठरली.