फेस शिल्डमध्ये प्रवासी, पीपीई किटमध्ये स्टाफ अन् कोरोना काळातील हवाई प्रवास!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 12:43 PM2020-05-25T12:43:26+5:302020-05-25T13:09:08+5:30

मुंबई : जवळपास दोन महिन्यानंतर आजपासून (दि.25) पुन्हा एकदा देशांतर्गत विमान सेवेला सुरुवात झाली आहे. विमानात बसण्याआधी प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग करण्यात आले. तसेच, सर्व प्रवाशांना विमान कंपनीकडून फेस कव्हर मास्क दिले. त्यानंतर हे मास्क लावल्यानंतर या प्रवाशांना विमानात एन्ट्री देण्यात आली.

आज आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल वगळता संपूर्ण देशात विमान सेवेला प्रारंभ झाला. दिल्ली विमानतळाहून सकाळी पहिले विमान पुण्यासाठी झेपावले. तर मुंबईहून पाटणासाठी सकाळी ६.४५ वाजता इंडिगोच्या विमानाने टेक ऑफ घेतला.

जवळपास दोन महिन्यानंतर देशांतर्गत विमान सुरू होत आहे. त्यामुळे विमानतळावर त्यांच्या टेक ऑफ आणि लँडिंगसाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. विमानतळावर नवीन नियमांसह अनेक व्यवस्था बदलण्यात आल्या आहेत.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी विमानतळावर दोन मीटर अंतर पाळणे बंधनकारक आहे. या व्यतिरिक्त राज्य सरकारांनी विमान प्रवासासंदर्भात आपापल्या राज्यांसाठी काही मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत.

दरम्यान, वृत्तसंस्था एएनआयने देशातील अनेक विमानतळांवरील फोटो प्रसिद्ध केले आहेत. तसेच, विमानातील प्रवाशांचेही फोटो टिपले आहेत. या फोटोमधून कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कशाप्रकारे नियमांचे पालन करण्यात येत आहे, ते दिसून येते.

देशांतर्गत विमान सेवा सुरु करण्यात आल्यानंतर विमानतळावर विशेष तयारी करण्यात आली आहे. विमानतळावरील नवीन नियमांमुळे आता सर्व काही बदलले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी विमानतळावर दोन मीटरचे अंतर आणि टचलेस सिस्टमचा अवलंब केला जात आहे.

आज जयपूर विमानतळासाठी 20 विमानांचे लँडिंग आणि उड्डाण होणार आहे. विमानतळ संचालकांच्या म्हणण्यानुसार, मुंबई आणि पुण्यातील उड्डाणे रद्द केली जाऊ शकतात.

त्याचबरोबर पहिल्या दिवशी उत्तर प्रदेशमधील लखनऊहून एकूण 36 विमानांचे उड्डाण होईल. यामध्ये लखनौहून 15 विमानांचे उड्डाण होणार आहे. मात्र, विजयवाडा आणि विशाखापट्टणम येथे 26 मेपासून विमानांचे उड्डाण सुरू करण्यात येणार आहे.

कोलकाता येथे 28 मे पासून विमान सेवा सुरू होणार आहे. तर, तामिळनाडूमध्ये कमी विमान उड्डाणे होणार आहेत. याचबरोबर, विमान उड्डाणे रद्द केल्यानंतर प्रवाशांना रिफंड केले जाईल किंवा ते पुन्हा शेड्यूल करू शकतात, यासाठी विमान कंपन्या प्रवाशांच्या संपर्कात आहेत.

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गेले दोन महिने केंद्र सरकारच्या सूचनेनुसार देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद होती. त्यामुळे विमान कंपन्यांना प्रचंड आर्थिक फटका बसला तसेच प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.