CoronaVirus Live Updates : सावधान! कोरोना महामारी संपलेली नाही, नवा व्हेरिएंट येण्याचा मोठा धोका; तज्ज्ञांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 09:07 AM2022-03-04T09:07:43+5:302022-03-04T09:35:01+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाची परिस्थिती बदलत असताना काही लोकांना कोरोना महामारी कायमची संपली असं वाटतंय

देशातील कोरोना रुग्णसंख्येने तब्बल चार कोटींचा टप्पा पार केला आहे. तर पाच लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी खबरदारी घेतली जात आहे.

मास्क, क्वारंटाईन, सोशल डिस्टंसिंगच्या माध्यमातून काळजी घेण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. तसेच कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये देखील घट सुरूच आहे.

रिकव्हरी रेट वाढत आहे आणि पॉझिटिव्हीटी रेट कमी होत आहे. कोरोनाची परिस्थिती बदलत असताना काही लोकांना कोरोना महामारी कायमची संपली असं वाटतंय. मात्र तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, कोरोना आता कायमचा संपला आहे, असं समज करुन घेऊ नका.

कोरोना व्हायरस हा अजूनही आपल्यामध्ये आहे. या व्हायरसचा नवीन व्हेरिएंट जगात कधीही येऊ शकतो. अशा स्थितीत सध्या कोरोनाबाबत गाफील राहणं योग्य नाही. निष्काळजीपणा घातक ठरू शकतो.

कोविड तज्ज्ञ डॉ जुगल किशोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरस सतत स्वतःला बदलत राहतो. म्युटेशनमुळे, हा व्हायरस नवीन व्हेरिएंटमध्ये बदलू शकतो. जर हा व्हेरिएंट वेगानं पसरला आणि लस किंवा नैसर्गिक प्रतिकारशक्तीला मागे टाकलं तर कोरोनाची प्रकरणे वाढू शकतात.

नवीन लाट येण्याची शक्यता फारच कमी आहे, कारण लोकसंख्येचा मोठा भाग ओमायक्रॉन व्हेरिएंटनं संक्रमित झाला आहे. लोकांमध्ये संसर्गाविरूद्ध प्रतिकारशक्ती असते. अशा परिस्थितीत जोपर्यंत धोकादायक व्हेरिएंट येत नाही. तोपर्यंत पुढची लाट येणार नाही. पण यामुळे लोकांना असं वाटू नये की कोरोना आता कायमचा संपला आहे.

आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव कुमार अग्रवाल म्हणतात की, जगात एका आठवड्यासाठी सरासरी 15 लाखांहून अधिक प्रकरणे दररोज येत आहेत. कोरोनाची साथ अजून संपलेली नाही हे लोकांनी समजून घेतले पाहिजे. अशा परिस्थितीत लोकांनी सावधगिरी बाळगणं अत्यंत आवश्यक आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये 55.7 टक्क्यांनी घट झाली आहे. मृत्यूदरही 76.6 टक्क्यांनी खाली आला आहे. भारतात लसीकरणाचा खूप फायदा झाला आहे.

दुसऱ्या लाटेत, जिथे एका दिवसात चार लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली, तिसर्‍या लाटेचा उच्चांक चार लाखांच्या खाली राहिला. तिसऱ्या लाटेत, मृत्यूची प्रकरणे आणि दैनंदिन प्रकरणे देखील दुसऱ्या लाटेच्या तुलनेत खूपच कमी होती.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेचा पीक लवकर आला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पण रुग्णसंख्येत घट होत असल्याने दिलासा मिळाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने जगभरातील लोकांना वेगाने संक्रमित केले आहे. या व्हेरिएंटने ज्यांना यापूर्वी कोविड झाला होता किंवा ज्यांनी लस घेतली आहे. त्या लोकांनाही आपल्या जाळ्यात ओढलं आहे.

कोरोनाची ही धक्कादायक वस्तुस्थिती समोर आल्यानंतर आता भीती आणखी वाढली आहे की कोरोना व्हायरसचा ओमायक्रॉन व्हेरिएंट किंवा भविष्यात येणारे अन्य व्हेरिएंट लोकांना पुन्हा संक्रमित करू शकतात.

जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार, सुरुवातीच्या तपासात असे आढळून आले आहे की ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे पुन्हा संसर्ग होण्याचा धोका आहे, विशेषत: जे लोक पूर्वी कोविड झाले आहेत ते सहजपणे पुन्हा संसर्गाचे बळी होऊ शकतात. तथापि, याबद्दल फार मर्यादित माहिती आहे.

सौम्य लक्षणांमुळे, पुन्हा संसर्गाची प्रकरणे ओळखणं थोडं कठीण आहे कारण त्या व्यक्तीची कोविड चाचणी होत नाही. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत पुन्हा संसर्गाची अनेक प्रकरणे ही समोर आली आहेत.

कोरोनाच्या महाभयंकर संकटात आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आवाहन आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांनी केले आहे. सध्या जगभरातील शास्त्रज्ञ आणि वैद्यकीय तज्ज्ञ हे ठरवू शकत नाहीत की नैसर्गिक संसर्ग किंवा लस यापासून किती काळ प्रतिकारशक्ती प्रभावी राहते.

वृद्ध लोक, मधुमेहाचे रुग्ण, हृदय, फुफ्फुसाचे आजार आणि कर्करोग असलेल्या लोकांना कोरोना व्हायरसचा पुन्हा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. म्हणूनच कोरोनाशी संबंधित नियमांचे पालन करणे आणि लसीकरण वेळेवर करणे आवश्यक आहे.