coronavirus: या गोष्टीने वाढवली कोरोनाला मात देण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या केरळची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 09:23 PM2020-05-06T21:23:29+5:302020-05-06T21:35:20+5:30

अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत परदेशात राहणाऱ्या व्यक्तींचं मायदेशात परतल्यावर खूप कौतुक होत असे. मात्र कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यात परदेशात राहत असलेल्या व्यक्तींची खूप ससेहोलपट होत आहे. अनेकांनी आर्थिक संकटामुळे आपला रोजगार गमावला आहे. अनेकांना मायदेशी परतण्याशिवाय काही पर्याय राहिलेला नाही. अशा अडचणीत सापडलेल्या भारतीय नागरिकांना देशात परत आणण्यासाठी केंद्र सरकारने व्यापक मोहीम हाती घेतली आहे.

अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत परदेशात राहणाऱ्या व्यक्तींचं मायदेशात परतल्यावर खूप कौतुक होत असे. मात्र कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यात परदेशात राहत असलेल्या व्यक्तींची खूप ससेहोलपट होत आहे. अनेकांनी आर्थिक संकटामुळे आपला रोजगार गमावला आहे. अनेकांना मायदेशी परतण्याशिवाय काही पर्याय राहिलेला नाही. अशा अडचणीत सापडलेल्या भारतीय नागरिकांना देशात परत आणण्यासाठी केंद्र सरकारने व्यापक मोहीम हाती घेतली आहे.

देशातील पहिला रुग्ण आढळलेल्या केरळने कोरोनाविरोधातील लढाई जवळपास जिंकली आहे. मात्र आता एका गोष्टीमुळे केरळची कोरोनाबाबतची चिंता वाढली आहे.

परदेशातून भारतीयांना परत आणण्यासाठी ६४ विमाने आणि ३ जहाजांचा वापर केला जाणार आहे. मात्र या नागरिकांचा घरवापसीमुळे केरळची चिंता वाढली आहे. कारण यातील बहुतांश नागरिक हे केरळमधीलच आहेत. पहिल्या टप्प्यात केरळमधील २२५० नागरिकांना परत आणले जाणार आहे.

एकीकडे केरळने कोरोनाविरोधातील लढाई जवळपास जिंकली आहे. येथे नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण जवळपास थांबले आहे. कोरोनाविरोधातील केरळचा रिकव्हरी रेट सर्वाधिक आहे. मात्र परदेशातून येणाऱ्या नागरिकांमुळे केरळ सरकारसमोरील आव्हान वाढणार आहे.

यामुळे चिंतीत असलेले केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. परदेशात अडकलेल्या सर्व भारतीयांना विमानात बसवण्यापूर्वी त्यांची कोरोना चाचणी करावी, त्यानंतरच त्यांना भारतात आणावे असे विजयन यांनी म्हटले आहे.

विमानात बसलेले एक किंवा दोन प्रवासी जरी कोरोनाबाधित असले तर त्यामुळे सर्व प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो, तसेच त्यामुळे केरळबरोबरच देशभरातही कोरोनाचा फैलवा वेगाने होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती विजयन यांनी व्यक्त केली.

७ ते १३ मेदरम्यान, एकूण ६४ विमानांमधून परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणले जाईल. यापैकी १५ विमाने केवळ केरळमध्ये येतील.

परदेशातून भारतीय प्रवाशांना मायदेशात परत आणण्याची ही सर्वात मोठी मोहीम ठरू शकते. पुढच्या काळात सुमारे दोन लाख भारतीयांना मायदेशात परत आणले जाऊ शकते.

दरम्यान, परदेशातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर भारतीय नागरिक मायदेशात परतल्याने केरळची अर्थव्यवस्था अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण केरळच्या अर्थव्यवस्थेमध्ये परदेशातून पाठवण्यात आलेल्या पैशांचा वाटा लक्षणीय आहे.