coronavirus : भारतातही इटलीप्रमाणेच पसरतोय कोरोना विषाणू, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 09:05 PM2020-04-09T21:05:31+5:302020-04-09T21:25:57+5:30

गेल्या काही दिवसात देशामध्ये कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने होत असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत देशात 5 हजार 734 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 166 जणांचा मृत्यू झाला आहे. चिंताजनक योगायोग म्हणजे भारतामधील कोरोनाबाधितांचा आणि मृतांचा आकडा इटलीतील कोरोनाबाधित आणि मृतांप्रमाणेच वाढत आहे.

गेल्या काही दिवसात देशामध्ये कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने होत असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत देशात 5 हजार 734 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 166 जणांचा मृत्यू झाला आहे. चिंताजनक योगायोग म्हणजे भारतामधील कोरोनाबाधितांचा आणि मृतांचा आकडा इटलीतील कोरोनाबाधित आणि मृतांप्रमाणेच वाढत आहे. केवळ फरक म्हणजे इटलीमध्ये मार्च महिन्यात कोरोनाचा प्रकोप सुरू झाला होता. तर भारतात एप्रिल महिन्यात कोरोनाचा फैलाव वाढू लागला आहे.

जगभरातील कोरोनाबाधितांच्या आकड्यांची तपासणी करणाऱ्या वर्ल्डमीटर या संकेतस्थळानुसार भारतात 1 एप्रिल पर्यंत कोरोनाचे 1998 रुग्ण सापडले होते. तसेच 58 जणांचा मृत्यू झाला होता. तर इटलीमध्ये 1 मार्च रोजी 1577 कोरोनाबाधित आणि 41 जणांचा मृत्यू झाला होता.

7 एप्रिलपर्यंत भारतात कोरोनाचे सुमारे 5 हजार हून अधिक रुग्ण सापडले होते. तसेच सुमारे 160 जणांचा मृत्यू झाला, तर 7 मार्चपर्यंत इटलीमध्ये 5 हजार 883 रुग्ण सापडले आणि 233 जणांचा मृत्यू झाला होता.

भारत आणि इटलीमध्ये एका दिवसात आढळलेल्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीतही काही प्रमाणात साम्य दिसून आले आहे. 1 मार्च रोजी इटलीत 573 कोरोनाबाधित सापडले होते. तर 1 एप्रिल रोजी भारतात एक दिवसात 601 कोरोनाबाधित सापडले होते.

1 मार्चपर्यंत इटलीमध्ये 33 जण कोरोनामुक्त झाले होते. तर भारतात 1 एप्रिलपर्यंत 25 जण कोरोनामुक्त झाले होते. तर इटलीत 7 मार्चपर्यंत 66 जण कुरणामुक्त झाले होते. तर भारतात हाच आकडा 93 एवढा आहे.

मात्र असे असले तरी भारतात कोरोनाबधितांचे आकडे कमी आहे. यामागे तज्ज्ञ तीन कारणे सांगत आहेत. ती म्हणजे भारतात कोरोनाच्या कमी असलेल्या चाचण्या, वेळीच केलेले लॉकडाऊन आणि भारतीय लोकांचे झालेले बीसीजी लसीकरण होय.

भारताची लोकसंख्या सुमारे 130 कोटी आहे. मात्र भारतात कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा योग्य आकडा समोर येऊ शकलेला नाही.

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार भारतात योग्य वेळी लॉकडाऊन केले. त्यामुळे भारत अद्यापपर्यंत दुसऱ्या आणि तिसऱ्या पातळीच्या मध्ये आहे. भारतात कोरोना विषाणूचा फैलाव चीन, अमेरिका आणि युरोपपेक्षा कमी आहे.

तसेच बीसीजीचे लसीकरणही भारताला कोरोनाचा प्रकोपापासून वाचवत आहे. भारतासह जगातील ज्या देशात बीसीजीचे लसीकरण दीर्घकाळापासून केले जात आहे तिथे कोरोनाचा धोका कमी आहे. ही बाब आयसीएमआरनेसुद्धा मान्य केली आहे.