मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार पुढच्या लोकसभेला नसणार? ते राजीनामा देणार अन् निवडणुकीची घोषणा होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 10:36 IST2025-02-19T10:31:42+5:302025-02-19T10:36:17+5:30

Gyanesh Kumar New CEC: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज सकाळी आपला कार्यभार सांभाळला आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि एक केंद्रीय मंत्री यांच्या समितीने कुमार यांच्या नावाची घोषणा केली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज सकाळी आपला कार्यभार सांभाळला आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि एक केंद्रीय मंत्री यांच्या समितीने कुमार यांच्या नावाची घोषणा केली आहे. कुमार यांचे नाव निवडताच विरोधी पक्षांनी निवडणूक आयोग केंद्राचा पोपट असणार असल्याची टीका केली आहे. अशातच कुमार यांच्या कार्यकाळावरून ते पुढच्या लोकसभा निवडणुकीसाठी नसणार असल्याचे अंदाज लावण्यात येत आहेत.

ज्ञानेश कुमार यांचा कार्यकाळ २६ जानेवारी २०२९ पर्यंतच राहणार आहे. कायद्यानुसार मुख्य निवडणूक आयुक्त वयाच्या ६५ व्या वर्षांपर्यंत पदावर राहू शकतात किंवा सहा वर्षेच राहू शकतात. अशातच ज्ञानेश कुमार यांना अवघी चार वर्षे मिळणार आहेत. यामुळे ज्ञानेश कुमार हे पुढची लोकसभा निवडणूक हाताळू शकणार नाहीत.

ज्ञानेश कुमार हे निवृत्त झाल्यानंतर लोकसभेची आचारसंहिता लागणार आहे. म्हणजेच नवीन आयुक्त ही आचारसंहिता घोषित करणार आहेत. यामुळे ज्ञानेश कुमार यांच्या अधिकाराखाली विविध राज्यांच्या निवडणुका आणि पोटनिवडणुकाच घेतल्या जाणार आहेत.

या वर्षाच्या अखेरीस बिहारची विधानसभा निवडणूक आहे. यानंतर २०२६ मध्ये केरळ, पाँडिचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालच्या निवडणुका आहेत. याची जबाबदारी या निवडणूक आयुक्तांकडे असणार आहे.

ज्ञानेश कुमार यांनी गृहमंत्रालयात असताना जम्मू आणि काश्मीरमध्ये संविधानाच्या कलम ३७० च्या काही तरतुदी रद्द केल्यानंतर त्यांनी निर्णयाची अंमलबजावणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. यानंतर त्यांनी १५ मार्च २०२४ रोजी निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता.

अयोध्या राम मंदिर बांधकाम समितीचे ज्ञानेश कुमार हे सदस्य देखील होते. केंद्र सरकारने त्यांना श्री राम मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्टमध्ये प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले होते. राम मंदिरातील जी रामलल्लाची मूर्ती आहे त्या मूर्तीची निवड करण्यासाठी समितीमध्येही त्यांचे नाव होते.