लोकसभा निवडणूक घोषणेपूर्वीच मोदी-शाहांचा BIG Plan; भाजपाचं 'मिशन १६०' काय आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 05:02 PM2023-08-28T17:02:25+5:302023-08-28T17:07:53+5:30

मिशन २०२४ चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भाजपा व्यापक रणनीतीवर काम करत आहे. लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच १६० जागांसाठी उमेदवार जाहीर करण्याचा पक्षात विचार सुरू आहे. या अशा जागा आहेत जिथे भाजपाची ताकद नगण्य आहे.

अशा 'वीक सीट्स'वर भाजपाने आपली स्थिती मजबूत करण्यासाठी काम सुरू केले आहे. यापैकी बहुतांश 'कमकुवत' जागा दक्षिण आणि पूर्व भारतातील आहेत. उमेदवारांची लवकर घोषणा केल्याने प्रतिस्पर्ध्यांच्या विरोधात मोठा फायदा होऊ शकतो असं भाजपला आशा आहे.

या १६० जागांमध्ये काही दिग्गज नेत्यांच्या लोकसभा मतदारसंघांचाही समावेश आहे. हे ४० क्लस्टर्समध्ये विभागले गेले आहेत आणि गेल्या काही महिन्यांत एक व्यापक सराव केला गेला आहे. अनेक ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्र्यांनी मिळून रोडमॅप तयार केला. त्या भागात अनेक दिवस घालवण्यासोबतच तळागाळात पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम केले.

या यादीत माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा वेल्लारी लोकसभा मतदारसंघ, सपा प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांच्या मैनपुरी मतदारसंघाचा समावेश आहे. या सर्व जागांवर भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा किंवा पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी प्रत्येकी एका रॅलीला संबोधित केले आहे. भाजपाच्या या रणनीतीमुळे विरोधी गटात खळबळ माजू शकते.

भाजपा आता यापैकी अनेक लोकसभेच्या जागांसाठी निवडणुकीपूर्वी उमेदवार जाहीर करू शकते. जेणेकरून उमेदवार फायदा घेऊ शकतील आणि त्यांची आणि पक्षाची स्थिती मजबूत करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. यातील बहुतांश जागा दक्षिणेकडील आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये आहेत, जेथे भाजपला अद्याप स्वबळावर सत्ता मिळवता आलेली नाही.

कदाचित त्यामुळेच पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला इथे थोडी घाई करावी असे वाटत असेल. या असुरक्षित लोकसभेच्या जागांसाठी उमेदवार जाहीर करण्याबाबतचा अंतिम निर्णय या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर घेतला जाऊ शकतो, असं वृत्त ईटीने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

लोकसभेच्या १६० जागांमध्ये भाजपाने २०१९ मध्ये गमावलेल्या बहुतांश जागांचा समावेश आहे. काही जिंकता येण्याजोग्या मतदारसंघांचाही यादीत समावेश करण्यात आला आहे कारण त्या जागा स्थानिक सामाजिक आणि राजकीय घटकांमुळे आव्हानात्मक राहतील असा पक्षाचा अंदाज आहे.

रोहतक आणि बागपतसारख्या जागा भाजपने जिंकल्या, पण त्यात त्यांचाही समावेश आहे. या १६० जागांवर पक्ष आपली संघटनात्मक यंत्रणा वाढवण्यासाठी आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी काम करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

२०१९ च्या निवडणुकीत भाजपाने अशाच आव्हानात्मक जागांची यादी तयार केली होती आणि त्यात मोठ्या प्रमाणात विजय मिळवला होता. २०१४ मध्ये २८२ च्या तुलनेत २०१९ मध्ये भाजपाने ५४३ सदस्यांच्या संसदेत ३०३ जागा जिंकल्या होत्या.

अलीकडेच, भाजपाने कदाचित पहिल्यांदाच मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकांसाठी अनेक उमेदवारांची घोषणा केली आहे, परंतु अद्याप येथे निवडणुकीचे वेळापत्रक अद्याप जाहीर व्हायचे आहे. लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीचा हा ट्रेलर मानला जात आहे.