Maharashtra Lockdown: महत्त्वाची बातमी! राज्यात लॉकडाऊन वाढणार का?; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 03:07 PM2021-05-11T15:07:46+5:302021-05-11T15:12:25+5:30

Health Minister Rajesh Tope on Maharashtra Lockdown: राज्यातील कोरोना परिस्थिती पाहता १५ मे नंतर लॉकडाऊन वाढणार की आणखी काही निर्बंध लागू होणार याबाबत राजेश टोपेंनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत.

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने ठाकरे सरकार लॉकडाऊन वाढवणार का? अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरू आहे. राज्यात १५ मे पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तर बहुतांश जिल्ह्यांनी याआधीच लॉकडाऊन जाहीर केला आहे.

राज्यातील रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढत असल्याचं पाहताच ठाकरे सरकारनं ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले होते. त्यानंतर हे निर्बंध १५ मे पर्यंत वाढवण्यात आले. या काळात एका जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात जातानाही ई पासची सक्ती नागरिकांवर करण्यात आली.

अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही बाबींना सरकारकडून परवानगी देण्यात आली. या काळात होणाऱ्या लग्नसमारंभावरही सरकारने निर्बंध आणलेत. २५ लोकांच्या उपस्थितीत फक्त २ तासांत विवाह सोहळा उरकरण्याची सरकारची सूचना आहे.

१५ मे पर्यंत असलेल्या निर्बंधाला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने राज्यात लॉकडाऊन वाढवणार की निर्बंध शिथील करणार असे प्रश्न लोकांच्या मनात पडले आहेत. याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी(Rajesh Tope) संकेत दिले आहेत. राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता आहे.

बुधवारी होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर सहकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ अशी माहिती राजेश टोपेंनी दिली आहे. बेक द चेन अंतर्गत राज्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. यात काही गोष्टींना सूट द्यायची की नाही यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात येईल.

जवळपास ११ जिल्ह्यांनी १० ते १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. दहापैकी नाशिक आणि बुलडाणा जिल्ह्यातील लॉकडाऊन २२ आणि २३ मेपर्यंत कायम आहे. ज्यांची मुदत १५ मे रोजी संपत आहे असे जिल्हे देखील पुन्हा मुदतवाढ करण्याच्या मानसिकतेत असल्याचे मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मुंबईतील रुग्णसंख्या सकृतदर्शनी कमी दिसत असली, तरीही लॉकडाऊन काढला तर अन्य राज्ये व जिल्ह्यातील लोक मोठ्या प्रमाणात मुंबईत येतील आणि तेथून कोरोनाची साथ पुन्हा राज्यभर पसरेल, म्हणून ३१ मेपर्यंत परिस्थिती आहे तशीच ठेवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. या कालावधीत कोरोनाचा संसर्ग कितपत असेल ते पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल.

दरम्यान, राज्यातील ४५ वर्षावरील व्यक्तींना लसीचा दुसरा डोस देणं महत्त्वाचं आहे. सध्या ५ लाख लोकांना लसीचा दुसरा डोस द्यायचा आहे. केंद्राकडून लसीचा साठा उपलब्ध होत नसल्याने अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद पडली आहेत.

केंद्र सरकारकडून कोविशिल्डचे १६ लाख डोस येणे बाकी आहे. मात्र लस उपलब्थ होत नसल्याने राज्य सरकारने खरेदी केलेले ३ लाख डोस आता ४५ वर्षावरील व्यक्तींना दिले जाणार आहेत. त्यामुळे राज्यात १८ ते ४४ वयोगटातील लोकांचं लसीकरण थांबण्याचे संकेत राजेश टोपेंनी दिले आहे.

त्याचसोबत १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला ब्रेक लावावा का याबाबत बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केली जाईल. स्पुतनिक लसीबाबत विचारणा केली असून अद्याप प्रतिसाद आला नसल्याचंही त्यांनी सांगितले. सध्या ज्यांना लसीचा पहिला डोस दिला आहे. त्यांना दुसरा डोस वेळेत देण्याची गरज आहे अन्यथा पहिला डोस वाया जाऊ शकतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली आहे. उद्याच्या बैठकीत निर्णय होईल अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली.