उन्हाळ्यात कोल्ड्रिंक पित असाल तर सावधान; उष्णतेच्या लाटेत केंद्राने जारी केला अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 09:22 IST2025-03-17T08:49:49+5:302025-03-17T09:22:31+5:30
Dehydration Reasons in Heat Wave:

उष्णतेने गेल्या काही दिवसांपासून कहर केला आहे. उकाड्यापासून वाचण्यासाठी लोक थंड पाणी, पेय आणि आईस्क्रीम आदी गोष्टी सेवन करत आहेत. अशातच लोकांसाठी केंद्र सरकारच्या संस्थेने इशारा जारी केला आहे. यामध्ये काय पिऊ नये हे सांगितले आहे.
उष्णतेपासून वाचविण्यासाठी जर तुम्ही कोल्ड्रिंक पित असाल तर आरोग्याच्या दृष्टीने ते हानीकारक आहे. या कार्बोनेटेड पेयामध्ये साखर मोठ्या प्रमाणावर असते, ती वेगाने शरिरातील पाणी कमी करते. यामुळे उन्हाळ्यात कोल्ड्रिंक पिणे धोकादायक आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या राष्ट्रीय हवामान बदल आणि मानवी आरोग्य कार्यक्रमाने (NPCCHH) थंड पेयांबद्दल इशारा जारी केला आहे.
थंड पेयच नाही तर कडक उन्हात चहा आणि कॉफी टाळण्याचे आवाहन देखील केले आहे. हवामान खात्याने रविवारी उष्णतेच्या लाटेबाबत अलर्ट जारी केला आहे. यानंतर हा इशारा देण्यात आला आहे.
ओडिशा आणि झारखंडमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात विदर्भ, छत्तीसगड, तेलंगणा आणि पश्चिम बंगालमध्येही उष्ण वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत देशातील जवळजवळ सर्व भाग तीव्र उष्णतेचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा NPCCHH ने दिला आहे.
एनपीसीसीएचचे वरिष्ठ अधिकारी डॉ. आकाश म्हणाले की, डिहायड्रेशनमुळे शरीराची क्षमता मर्यादित होऊ शकते आणि गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. बहुतेक लोकांना हे माहित नाही की थंड पेये जे थंड ठेवण्याचा दावा करतात ते देखील खूप धोकादायक असतात.लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
कार्बोनेटेड शीतपेये प्यायल्याने घाम लवकर येतो, ज्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्याऐवजी साधे पाणी प्या, असे आवाहन मॅक्स हॉस्पिटलमधील वरिष्ठ डॉक्टर विवेक कुमार यांनी सांगितले आहे.
चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन असते, जे शरीराचे तापमान किंचित वाढवून डिहायड्रेशन वाढवू शकते. यामुळे चहा कॉफी देखील टाळा, असे सांगण्यात आले आहे.
पुरेशा प्रमाणात साधे पाणी, नारळ पाणी किंवा कमी साखरेचे फळांचे रस यांसारखे इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये प्यावीत, असेही डॉक्टरांनी सुचविले आहे.
पाणी कमी झाले तर...
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे रक्तदाब आणि हृदय गतीची समस्या उद्भवू शकते. मूत्रपिंड आणि मेंदूच्या पेशींना नुकसान होऊ शकते.
सिगारेट, बिडी ओढणाऱ्या किंवा मद्यपान करणाऱ्या लोकांमध्ये डिहायड्रेशनमुळे रक्त घट्ट होऊ शकते, यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.