मोठी बातमी! महाविकास आघाडीत फूट? काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे सर्व जिल्हाध्यक्षांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 06:00 PM2021-11-24T18:00:46+5:302021-11-24T18:05:14+5:30

आगामी काळात राज्यात महापालिका, नगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यातच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारला २ वर्ष पूर्ण झाली. मात्र तरीही आजही तिन्ही पक्षात मतभेद असल्याचं दिसून येते.

महाविकास आघाडीतला प्रमुख घटक पक्ष काँग्रेसनं महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात महापालिकांसह जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत.

या निवडणुकीत काँग्रेसनं एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवा असं पत्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सर्व जिल्हाध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्षांना पाठवलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याचं जाणवत आहे.

त्याचसोबत या पत्रात स्थानिक पातळीवर परस्पर निर्णय घेऊ नयेत. कसल्याही तडजोडी करू नयेत असे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील निवडणुका रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. मागील अनेक दिवसांपासून नाना पटोले यांनी निवडणुका स्वबळावर लढवण्यासाठी ठाम होते.

जिल्हा परिषदा, पंचायत समिती, महापालिका निवडणुका महत्त्वाच्या असून त्यात पक्ष संघटना बळकट करा. बुथ कमिट्यांची बांधणी भक्कम करा. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळेल यासाठी कामाला लागा असं नाना पटोलेंनी पत्रात सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूरात पुढील निवडणुकीत आघाडी झाली तर ठीक अन्यथा एकट्याने निवडणूक लढवू अशी भूमिका मांडली होती. तर शिवसेनाही निवडणुकीच्या दृष्टीने तयार सुरु केली आहे.

मविआ सरकार जनतेच्या पसंतीला उतरलं असून २ वर्षाच्या काळात विधान परिषद निवडणुकीसह ग्रामीण निवडणुकांमध्येही काँग्रेसनं चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे नव्या उत्साहानं आणि ताकदीनं पक्षाला निवडणुकीत यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा अशी सूचनाही देण्यात आली आहे.

अंबरनाथ येथे एका कार्यक्रमात नाना पटोले म्हणाले होते की, काँग्रेस हा कधीही न संपणारा पक्ष आहे. काँग्रेस वाढविण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. राज्यात महाविकास आघाडी करण्यामागे केवळ भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हाच हेतू होता असं त्यांनी सांगितले.

त्यामुळे महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी काँग्रेसला गृहीत धरून काम करू नये. आघाडी आणि महाआघाडीच्या गोंधळात काँग्रेसची ताकद कमी होणार नाही, याची आम्ही दक्षता घेऊ, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.

आगामी निवडणुकांबाबत काँग्रेसनं अशाप्रकारे स्वबळावर लढण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता शिवसेना-राष्ट्रवादी काय निर्णय घेतात हे पाहणं गरजेचे आहे. शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढतील असं बोललं जातं आहे. परंतु नागपुरात शरद पवारांनी केलेले विधानही अनेकांचे लक्ष वेधून घेते