विधानभवनाच्या प्रांगणातच नितेश राणे अन् अबु आझमी यांच्यात खडाजंगी; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 03:16 PM2023-03-14T15:16:51+5:302023-03-14T15:21:34+5:30

राज्यात लव्ह जिहादवरून सातत्याने विविध जिल्ह्यात मोर्चे काढले जात आहेत. लव्हजिहाद विरोधी कायदा बनवावा अशी मागणी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून लावून धरली जात आहे. त्यात लव्ह जिहादचे पडसाद विधानभवनाच्या प्रांगणातच उमटले.

विधानभवनाच्या प्रांगणात भाजपा आमदार नितेश राणे लव्ह जिहादवर बोलत असताना त्याठिकाणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमीही दाखल झाले. त्यावेळी सुरुवातीला या दोन्ही आमदारांनी हातात हात मिळवला. त्यानंतर मात्र दोघांमध्ये लव्ह जिहादवरून एकमेकांना आव्हान देण्याची भाषा झाली.

मुंबईत किती जागांवर अनाधिकृत ३ मजली मदार बनवली आहे. ग्रीन झोनवर ही मदार बनवली. असं कुठे असतं का असा सवाल नितेश राणेंनी केला त्यावर जितके अनाधिकृत प्रार्थनास्थळे आहेत सर्व तोडा. त्याला कुणी विरोध केलाय. तुम्ही महापालिकेला लिखित द्यावं असं प्रत्युत्तर आमदार अबू आझमींनी दिले.

तसेच तोडायला गेले तर हत्यारे घेऊन येण्याची धमकी देतात. तुम्ही माझ्यासोबत चला असं नितेश राणे म्हणाले तेव्हा तुम्ही सांगाल तेव्हा येईन, तर मला तारीख आणि वेळ सांगा तुम्हाला घरातून पिकअप करतो. लव्ह जिहाद कुठे होतोय हे दाखवतो असं आव्हान नितेश राणेंनी दिले.

प्रेमाची भाषा आम्ही पण बोलतोय. तुमचा विचार सगळ्यांमध्ये असायला हवा. पण ते जात नाही असं नितेश राणेंनी म्हटलं. तर जे आक्रोश करतात त्यांना तुम्ही बोलवा आणि मुस्लिमांना बोलवतो चर्चा करू असं आमदार अबू आझमींनी सांगितले आणि त्याठिकाणाहून निघून गेले.

त्यानंतर माध्यमांशी बोलताना नितेश राणे म्हणाले की, आकड्यांच्या खेळात एकाही हिंदू मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होत असेल तर ते थांबवायचं नाही का? मी या सर्व प्रकरणावर पुराव्यासकट महाराष्ट्रासमोर माहिती आणणार आहे असं म्हटलं.

काही दिवसांनी पत्रकार परिषदेत मी सर्व मांडेन. त्यानंतर जे जे लोक धर्मांतरणाचं समर्थन करतायेत. लव्हजिहादच्या विरोधात बोलतायेत. त्यांना उत्तर मिळेल. मुलींचे आयुष्य बर्बाद केले जातात. ही समाजात लागलेली कीड आहे. त्यात राजकारण करता कामा नये असं नितेश राणेंनी सांगितले.