३८ वर्षांपूर्वी निघाली 'भारत जोडो यात्रा', मराठमोळ्या व्यक्तीनेचं केलं होतं नेतृत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 11:35 AM2023-01-13T11:35:38+5:302023-01-13T11:45:41+5:30

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रा अंतिम टप्प्यात असून 30 जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये या यात्रेचा समारोप होत आहे. 20 जानेवारीला हा मोर्चा जम्मू-काश्मीरमध्ये दाखल होईल आणि 30 जानेवारीला श्रीनगरमध्ये ध्वजारोहण करुन यात्रेची सांगता होईल.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रा अंतिम टप्प्यात असून 30 जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये या यात्रेचा समारोप होत आहे. 20 जानेवारीला हा मोर्चा जम्मू-काश्मीरमध्ये दाखल होईल आणि 30 जानेवारीला श्रीनगरमध्ये ध्वजारोहण करुन यात्रेची सांगता होईल.

भारत जोडो यात्रेचा भव्य समारोप करण्यासाठी, पक्षानं 24 समविचारी पक्षांना श्रीनगरमध्ये येण्याचं आमंत्रण दिलं आहे. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सर्व विरोधी पक्षांना श्रीनगर येथील भारत जोडो यात्रेच्या समारोप समारंभाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण पत्र पाठवलं आहे.

भारत जोडो यात्रेच्या ग्रँड फिनालेसाठी काँग्रेस पूर्ण ताकद लावत आहे. पक्षाचं सर्वोच्च नेतृत्व श्रीनगरमध्ये उपस्थित राहणार असून त्यात काँग्रेस कार्यकारिणी (CWC) सदस्य, खासदार, आमदार आणि मुख्यमंत्री यांचाही समावेश असेल, असे सांगण्यात येत आहे. यासाठी काँग्रेसनं श्रीनगरमध्ये सुमारे 200 खोल्या बुक केल्या आहेत.

देशभरात राहुल गांधींच्या या यात्रेची चर्चा रंगली आणि या यात्रेत अनेक दिग्गज, सेलिब्रिटी सहभागी झाल्याचंही पाहायला मिळाल. मात्र, या निमित्ताने ३८ वर्षांपूर्वी निघालेल्या भारत जोडो यात्रेचीही आठवण अनेकांना झाली.

कन्याकुमारी ते काश्मीर मार्गावर १४ हजार किमीचा प्रवास करणारी भारत जोडो यात्रा ३८ वर्षांपूर्वी एक मराठमाोळ्या माणसाने सुरू केली होती. राष्ट्रीय एकात्मतेला रुजवण्यासाठी, वाढविण्यासाठी गांधीवादी विचारवंत आणि समाजसेवक बाबा आमटेंनी ही यात्रा काढली होती.

सन १९८४ साली सुवर्णमंदिरात ऑपरेशन ब्लू स्टारअंतर्गत सैन्य पाठवल्यानंतर झालेल्या दंगलसदृश्य वातावरणातून आणि तणावातून शांतता प्रस्थापित करण्यासाठी देशाची एकता आणि अखंडता अबाधित ठेवण्यासाठी बाबा आमटेंनी ही यात्रा काढली होती.

तारा धर्माधिकारी यांनी बाबा आमटेंवर लिहिलेल्या पुस्तकामध्ये या भारत जोडो यात्रेचं सविस्तर वर्णन केलं आहे. कन्याकुमारी येथून एका सायकल रॅलीत जवळपास १०० युवक आणि १६ महिलांचे नेतृत्व करत भारत जोडो यात्रा सुरू केली होती.

बाबा आमटेंच्या यात्रेत सहभागी झालेल्या सर्वांचे वय हे ३५ पेक्षा कमी होते, त्यामुळे ही युवकांची भारत जोडो यात्रा होती, ज्यास ते YES किंवा युथ इमर्जन्सी असे म्हणत.

वयाच्या ७० व्या वर्षी बाबा आमटेंनी या यात्रेचं नेतृत्व केलं होतं. सोबतली सव्वाशे सायकलवारी करणारे युवा होते. यात्रेनं कधी चालतही प्रवास केला, सभा, चर्चासत्र, भेटीगाठींमधून त्यांनी संप्रदाय, एकता आणि अखंडतेचा प्रचार व प्रसार केला.

गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब आणि जम्मू-कश्मीरसह एकूण १४ राज्यांतून ही यात्रा गेली होती. दोन टप्प्यात या यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. पहिल्या टप्प्यात सगल ११० दिवस आणि दुसऱ्या टप्प्यात सलग १४६ दिवसांचा प्रवास यात्रेनं केला होता.