पद्म पुरस्कार शिफारस समितीच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरे, नितेश राणेंनी उडवली खिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 04:21 PM2020-08-12T16:21:23+5:302020-08-12T16:29:45+5:30

वेगवेगळ्या क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या मान्यवरांची पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे.

केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी मान्यवरांच्या नावांची शिफारस करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे पर्यटन, पर्यावर आणि राजशिष्टाचार मंत्री अदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

केंद्र सरकारतर्फे दरवर्षी हे पुरस्कार; कला, साहित्य, विज्ञान, शिक्षण, उद्योग, क्रीडा, वैद्यक, सामाजिक सेवा इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींना देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो.

याच नावांची शिफारस करण्यासंदर्भातील काम या समितीच्या माध्यमातून केलं जातं. यंदा या समितीचे अध्यक्षपद आदित्य ठाकरेंना देण्यात आलं आहे. या नियुक्तीनंतर त्यांचे अभिनंदन करणारे ट्विट शिवसेनेचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी अध्यक्ष राज्य नियोजन मंडळाचे कॅबीनेट मंत्री राजेश क्षीरसागर यांनी केलं आहे.

या समितीच्या अध्यक्षपदी पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली असून समितीत ५ कॅबिनेट मंत्री, २ राज्यमंत्री, प्रधान सचिव, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी अशा ९ जणांचा समावेश आहे.

यात उद्योगमंत्री सुभाष देसाई, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री उद्योग अदिती तटकरे, राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम दत्तात्रय भरणे यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.

प्रधान सचिव आणि मुख्य राजशिष्टाचार अधिकारी यांची ही या समितीत सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, या समितीच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरेंच्या निवडीनंतर आमदार नितेश राणेंनी आदित्य यांची खिल्ली उडवली आहे.

नितेश राणे यांनी ट्विट करुन आदित्य यांच्या निवडीची माहिती दिली. त्यासोबतच आता आशा करुयात की दिनो मोरियाला लवकर पद्म पुरस्कार मिळणार नाही, असेही म्हटले.

नाईट लाईफ गँगसोबत दिनो एम. चं मोठं योगदान आहे, तरीही त्याला लवकर पद्म पुरस्कार मिळणार नाही, अशी आशा करुयात. वेट अँड वॉच असं ट्विट नितेश राणेंनी केलंय.

राणे बंधुंकडून नेहमीच ठाकरे कुटुंबाला आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करण्यात येते, या निवडीवरुनही नितेश राणेंनी टीका केलीय