जगातील दुसरी लांब भिंत भारतात; एकाचवेळी दहा घोडे दौडू शकतात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 16:25 IST2019-04-05T16:14:54+5:302019-04-05T16:25:39+5:30

जगातील सात आश्चर्यांपैकी एक ‘ग्रेट वॉल ऑफ चायना’ म्हणून सर्वांना माहीत आहे. या चीनच्या वॉलनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब भिंत भारतात आहे. याबाबतची माहिती कमी लोकांना आहे. या भिंतीला ‘द ग्रेट वॉल ऑफ इंडिया’ असेही म्हटले जाते.
राजस्थानमधील उदयपूरजवळ असलेल्या कुंभलगड या किल्ल्यावर ही भिंत बांधण्यात आली आहे. अकराशे फुटांच्या कुंभलगड किल्ल्याच्या भोवताली बांधलेल्या या भिंतीचा विस्तार सुमारे 36 किलोमीटर इतका आहे. तर भिंतीची रुंदी पंधरा फुटांची आहे.
या भिंतीवरुन एकाच वेळी दहा घोडे दौडू शकतात इतकी ही लांब-रुंद, अजस्त्र आहे. कुंभलगड महाराणा कुंभ यांनी बनवविला.
या किल्ल्याच्या घडणीकरिता पंधरा वर्षांचा अवधी लागला. हा किल्ला बांधण्यास 1443 साली सुरुवात झाली, त्यानंतर 1458 मध्ये या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले.
या किल्ल्याला सात विशालकाय दरवाजे असून, बळकट बुरुज या किल्ल्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने उभारण्यात आले होते. या किल्ल्याच्या सर्वात वरच्या भागामध्ये ‘बादल महाल’ आणि ‘कुंभ महाल’ या दोन निवासी वास्तू आहेत.
वीर पृथ्वीराज आणि राणा सांगा यांचे बालपण याच किल्ल्यावर गेले. पन्ना दाई ने महाराणा उदय सिंह यांचे पालनपोषण याच किल्ल्यावर गुप्तपणे केले होते. हल्दीघाटीचे युद्ध सुरु असताना महाराणा प्रताप यांचे याच किल्ल्यावर काही काळ वास्तव्य होते.