Friendship Day : मैत्रीला सलाम! एकेकाळी काढायचे गाड्यांचे पंक्चर; मित्रांनी फी भरली अन् झाले IAS

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2020 04:44 PM2020-08-02T16:44:28+5:302020-08-02T17:08:02+5:30

ऑगस्ट महिना येताच फ्रेंडशिप डे ची चाहूल लागते. कारण ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा मैत्री दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी लॉकडाऊनमुळे प्रत्यक्ष भेटून मैत्री दिवस साजरा करता आला नसला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी आपल्या मित्र मैत्रिणींना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आयुष्यातील सर्वच टप्प्यात मित्र हे महत्वाचा भाग असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका आएएस अधिकारी झालेल्या गृहस्थाच्या मैत्रीची कहाणी सांगणार आहोत.

तुमचा विश्वास बसणार नाही पण हे आएएस अधिकारी झालेले गृहस्थ केवळ मित्रांच्या पांठिब्यामुळे इथपर्यंत पोहोचले आहेत. यांचे नाव वरूण बरनवाल आहे. एकेकाळी हा वरूण हे सायकलच्या दुकानात पंक्चर काढण्याचं काम करायचे. वरूण महाराष्ट्रातील बोईसर शहरातील रहिवासी आहेत. २०१३ मध्ये झालेल्या यूपीएससी परिक्षेत त्यांनी ३२ वा क्रमांक पटकावला.

वरूण यांच्या घरची परिस्थिती फार बिकट होती. कुटुंबात नेहमीच पैशांची चणचण भासत होती. त्यामुळे वरूण सायकलचे पंक्चर काढण्याचे काम करत होते. दहावीची परिक्षा झाल्यानंतर त्यांनी सायकलच्या दुकानात काम करण्याचं ठरवलं होतं. कारण पुढील शिक्षणासाठी कुटुंबाकडे फारसे पैसै नव्हते.

२००६ मध्ये वरूण यांनी १० वी ची परिक्षा दिली. परिक्षा संपल्यानंतर तीन महिन्यांनी वडिलांचा मृत्यू झाला. १० वीच्या परिक्षेत वरूण चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाले. त्यावेळी त्याच्या आईने सांगितले ''तू अभ्यास कर आम्ही काम करू.'' अकरावी आणि बारावीचा काळ खूपच कठीण होता. कॉलेजमध्ये एडमिशन घेण्यासाठी पैश्यांची कमतरता भासत होती. त्यावेळी वरूण यांनी आईला सांगितले की, पैसै नाहीत म्हणून मी एक वर्ष थांबायला तयार आहे. पुढच्या वर्षी एडमिशन घेईन.

त्यानंतर वरूण यांच्या वडिलांचे उपचार ज्या डॉक्टरांनी केले होते. त्या डॉक्टरांनी कॉलेजची फी भरली. वरूण सांगतात की मी माझ्या शिक्षणासाठी कधीही एक रुपयाही खर्च केला नाही. माझे मित्र आणि त्यांच्या पालकांनी माझ्या कॉलेजच्या शिक्षणाचे पैसै भरले. त्यामुळे माझ्या शिक्षणासाठी सहकार्य करत असेलल्यांचा मी नेहमी ऋणी राहीन.

वरूण यांना आएअस अधिकारी बनण्याची इच्छा होती. म्हणून त्यांनी UPSC परिक्षेचा फॉर्म भरला. प्रीलिम्सची तयार करण्यासाठी वरूण यांच्याकडे चार महिन्यांचा वेळ होता.

यूपीएससी प्रीलिम्सचा निकाल आल्यानंतर वरूणचा क्रमांक ३२ वा होता. मित्रांनी केलेल्या सहकार्यामुळे हे शक्य झाले असं वरूण यांनी सांगितले.