Coronavirus: Google भाऊ, घरात दारु कशी बनवायची?; तळीरामांनी शोधली नवी शक्कल अन् बनला ट्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 07:29 PM2020-04-15T19:29:24+5:302020-04-15T19:34:19+5:30

कोरोना विषाणूची लागण होण्यापासून रोखण्यासाठी सरकारने देशात लॉकडाऊन केले आहे. लॉकडाऊनमुळे सर्व दारूची दुकाने बंद आहेत. ज्यानंतर मद्यप्रेमींसाठी त्रास वाढला आहे. एवढेच नाही तर जे लोक सिगारेट, बिडी, पान, गुटखा खातात त्यांनाही त्रास होत आहे.

देशातील बर्‍याच भागात दुकाने बंद आहेत, त्यामुळे बाजारात दारूचे दर चौपट झाले आहेत. वाढीव किंमतींसह अनेक ठिकाणी मद्यही छुप्या पद्धतीने विक्री करताना दिसून आले आहे.

सध्या लॉकडाऊनमुळे तळीरामांच्या हाताला कोणतेही काम नाही अन् पोटात दारू नाही. त्यामुळे आपल्या मित्रांच्यासोबत बैठका नाहीत. नेहमी दारू पिण्याची सवय असल्याने आता दारू मिळत नसल्याने अंगाचा थरकाप सुरू झालेला पाहायला मिळतो.

कोरोनाच्या धास्तीने बाहेर पडायचं नसलं तरी दारूची ओढ बाहेर घेऊन जाते. सगळी दुकानं बंद पाहून तळीरामांची चिडचिड होते. आणि या बाहेर भटकताना जर पोलिसांनी पकडलं तर त्यांच्या काठ्यांचा प्रसादही खावा लागतो.

इतकचं नाही तर मागील १५ दिवसांपासून दारु न मिळाल्याने काही तळीरामांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

जेव्हा दारूचे व्यसन खिशाला महागात पडू लागले, तेव्हा बर्‍याच लोकांनी दारू सोडण्याचे ठरविले, त्याच वेळी बरेच लोक यातून नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत होते. त्यापैकी एक म्हणजे 'घरी दारू बनवणे'

लॉकडाऊनच्या काळात गुगलवर सध्या सर्वात जास्त घरात दारु कशी बनवावी? हे सर्च केले जात आहे. गुगल ट्रेंडनुसार, लोकांनी 22 ते 28 मार्चदरम्यान गुगलवर घरात दारु कशी बनवता येईल, सर्वाधिक सर्च केले.

उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की मार्चअखेर ग्रे-मार्केट विक्रेते दारूच्या दुप्पट किंमती आकारत होते. बरेच लोक अवैध दारूकडे वळत आहेत. त्याचबरोबर अवैध विक्री रोखण्यासाठी काही मद्य दुकानांना सील ठोकण्यात आले आहे.

दुसरीकडे, बरेच तळीराम म्हणतात की, बाजारात दारूच्या किंमती वाढल्यामुळे त्यांना १७० रुपयांच्या व्हिस्कीच्या बाटलीला ७०० रुपयांपर्यंत पैसे द्यावे लागत आहेत. बरेच तळीराम दारूची जास्त किंमत देण्यास तयार आहेत, परंतु तरीही त्यांना दारू मिळत नाही.

देशात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 11 हजारांच्या पार केली आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा काळ 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आता तळीरामांच्या समस्या आणखी वाढणार आहेत.