घरांची राखरांगोळी अन् आक्रोश! 47000 मृत्यू; इस्रायल-हमास युद्धात कोणाचं किती नुकसान?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 14:13 IST2025-01-17T13:30:45+5:302025-01-17T14:13:09+5:30
Israel Hamas war update: एका वर्षापेक्षा अधिक काळ सुरू असलेले इस्रायल हमास युद्ध थांबवण्याच्या दिशेने पावलं टाकली जाताहेत. पण, अजूनही मृत्यूचा जबडा आ वासून आहे. गेल्या १५ महिन्यात युद्धामुळे काय काय घडलं, हेच जाणून घ्या...

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविरामाचा करार झाला आहे. इस्रायल टाइम्सच्या वृत्तानुसार, इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या कार्यालयाने याला दुजोरा दिला आहे. युद्धविरामच्या दिशेने पावले टाकली जात असताना आता गेल्या १५ महिन्यात गेलेल्या बळींची संख्या आणि वित्तहानी याची आकडेवारीही समोर येत आहे. या युद्धात इस्रायल आणि पॅलेस्टाईनचे प्रचंड नुकसान झाले आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शुक्रवारी सांगितले की, 'गाझा पट्टीत जे इस्रायलचे नागरिक ओलीस ठेवण्यात आले आहेत, त्यांना परत करण्याचा करार झाला आहे. १५ महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या युद्ध आता शमताना दिसत आहे. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने घुसखोरी करत इस्रायलवर हल्ला केला होता. त्यानंतर हा संघर्ष युद्धात बदलला. इस्रायलने केलेल्या हल्ल्यात पॅलेस्टाइनचे प्रचंड नुकसान झाले होते.
पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, इस्रायलकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात आतापर्यंत ४६ हजारांपेक्षा अधिक नागरिक मारले गेले आहेत. तर गाझा पट्टीतील ९० टक्के लोकांना घरंदारं सोडून दुसरीकडे जावं लागलं आहे. या युद्धामुळे गाझा पट्टीत घरादारांची राखरांगोळी झाली आहे.
७ ऑक्टोबर २०२३ ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत हमासने केलेल्या हल्ल्यात १,१३९ इस्रायली लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ८ हजार ७३० नागरिक जखमी झाले आहेत. उलट इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये गाझा पट्टी उद्ध्वस्त झाली आहे. ४६ हजार ७०७ पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले असून, १,१०,२६५ लोकांचा मृत्यू झाला आहे. मरण पावलेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या सर्वाधिक आहे.
इस्रायलने गाझा पट्टीतील नागरी वसाहतींनाच लक्ष्य केले. इमारतींवर केलेल्या बॉम्बवर्षामुळे २३ लाख लोकसंख्या असलेल्या गाझापट्टीतील ९० टक्के लोकांनी घरंदारं सोडून दुसरीकडे आश्रय घेतला आहे. या लोकांना दोन वेळचं अन्नही मिळेना झालंय. नोव्हेंबर २०२४ मध्ये एका आठवड्यांसाठी युद्धविराम घोषित करण्यात आला होता. त्यावेळी गाझातून १०० इस्रायली ओलिसांना सोडण्यात आले होते.
कतारची राजधानी दोहा येथे गेल्या काही आठवड्यांपासून युद्धविराम करार करण्याबद्दल चर्च सुरू होती. हमास आणि इस्रायलने वाटाघाटीच्या अटींवर सहमती दर्शवल्यानंतर शुक्रवारी इस्रायलने कराराला मंजुरी दिली. नेतन्याहू यांनीही याला दुजोरा दिला.
दरम्यान, युद्धविराम करार करण्याला नेतन्याहू यांच्या सरकारमध्ये सुरक्षा मंत्री असलेल्या बेन ग्विर इतामार यांनी विरोध केला आहे. करार मंजूर झाल्यास नेतन्याहू सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा इशारा त्यांनी दिला. हमाससोबत करार म्हणजे मोठा निष्काळजीपणा असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.