बायकोसाठी काहीही! नेपाळच्या नव्या पंतप्रधानांची 'हटके' लव्हस्टोरी; सरकारला दिलेली धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 13:26 IST2026-03-27T13:12:39+5:302026-03-27T13:26:14+5:30
Sabina Kafle: सध्या नेपाळमध्ये, बालेश नंतर त्यांची पत्नी सबिना हिचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे. बालेन यांच्या यशात सबिनाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

नेपाळचे प्रसिद्ध रॅपर आणि काठमांडूचे माजी महापौर बालेन शाह यांनी शुक्रवारी नेपाळच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. बालेन शाह यांच्या राजकीय प्रवासाची जेवढी चर्चा आहे, तेवढीच चर्चा आता त्यांच्या पत्नीची म्हणजेच सबीना काफले यांची होत आहे.

बालेन यांच्या प्रत्येक यशात खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या सबीना नक्की कोण आहेत आणि त्यांची भेट कशी झाली, याबद्दलची रंजक माहिती समोर आली आहे.

सबीना काफले या नेपाळमधील मोरंग जिल्ह्यातील उरलाबारी येथील रहिवासी आहेत. त्या व्यवसायाने लेखिका आणि कवयित्री आहेत. प्रेम आणि जीवनावर आधारित त्यांच्या कविता नेपाळमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत.

त्यांनी 'दीपलता' नावाची कादंबरीही लिहिली आहे. विशेष म्हणजे, बालेन शाह हे सबीना यांच्या सौंदर्यापेक्षा त्यांच्या शब्दांच्या आणि कवितांच्या प्रेमात पडले होते. सबीना यांनी नोबल कॉलेजमधून पब्लिक हेल्थमध्ये पदवी पूर्ण केली आहे.

बालेन आणि सबीना यांची प्रेमकथा सोशल मीडियापासून सुरू झाली. सबीना आपल्या कविता सोशल मीडियावर शेअर करायच्या. रॅपर असलेल्या बालेन यांना या कविता प्रचंड आवडल्या.

२०१७ मध्ये एका साहित्य कार्यक्रमात या दोघांची पहिली भेट झाली. भेटीगाठी वाढल्या आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. २०१८ मध्ये या जोडीने लग्नगाठ बांधली. २०२३ मध्ये त्यांना एक गोंडस मुलगी झाली.

बालेन शाह नेहमी सांगतात की, त्यांच्या यशात सबीना यांचा मोठा वाटा आहे. लग्नापूर्वी बालेन केवळ त्यांच्या संगीतावर लक्ष केंद्रित करत असत. मात्र, सबीना यांच्याशी भेट झाल्यानंतर ते देश आणि लोकांच्या मूलभूत गरजांचा विचार करू लागले.

२०२२ मध्ये जेव्हा बालेन यांनी अपक्ष म्हणून काठमांडूच्या महापौरपदाची निवडणूक जिंकली, तेव्हा सबीना यांनी त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. आपल्या कविता आणि प्रभावी भाषणांच्या जोडीने त्यांनी लोकांचे लक्ष बालेन यांच्याकडे वळवले होते.

बालेन शाह आपल्या पत्नीवर किती प्रेम करतात, याचे एक उदाहरण २०२३ मध्ये पाहायला मिळाले होते. सबीना एका सरकारी वाहनातून जात असताना ट्रॅफिक पोलिसांनी त्यांना अडवले होते.

या घटनेने बालेन इतके संतापले की त्यांनी थेट धमकी दिली होती की, "जर महानगरपालिकेच्या गाड्यांना पुन्हा रोखले गेले, तर मी सिंह दरबारला आग लावीन." या विधानामुळे नेपाळच्या राजकारणात मोठा गदारोळ झाला होता, मात्र बालेन आपल्या पत्नीच्या सन्मानासाठी कोणाशीही भिडायला तयार असतात, हेच यातून दिसून आले.

















