भारताविरुद्ध चीन आणि पाकिस्तानचं मोठं षडयंत्र?; कारगिल युद्धावेळीही ‘असचं’ घडलं होतं!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 10:28 AM2020-05-23T10:28:51+5:302020-05-23T10:35:12+5:30

लडाखमधील लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल (एलएसी) भारत-चिनी सैन्यांदरम्यान सुरू असलेला बेबनाव अधिकच तीव्र होत आहे. चीनकडून पांगोंग त्सो सरोवराला लागून असलेल्या भागात बंकर बांधत आहे तर गाल्व्हन प्रदेशात ३ ठिकाणी ते भारतीय क्षेत्रात दाखल झाले

सीमेवर चीनची ही आक्रमकता अशावेळी दाखवत आहे ज्यावेळी काश्मीर खोऱ्यात पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार सुरु आहे. पीओकेमध्ये इस्लामाबाद निवडणुका होणार आहेत. एलओसी आणि एलएसीवर पाकिस्तान आणि चीन एकत्र कार्यरत राहणे योगायोग नाही, परंतु ते एकमेकांशी जोडलेले आहेत, असे तज्ज्ञांचे मत आहे.

हे भारताविरूद्ध मोठं षडयंत्र नाही का? पूर्वी चीनची द्वेषबुद्धी लक्षात घेता हे षडयंत्र होण्याची शक्यता जास्त आहे. फिंगर एरिया काय आहे? पांगोंग सो सरोवरालगतच्या पर्वतीय पायथ्यापासून बनवलेल्या प्रदेशांना फिंगर एरिया म्हणतात. यावर दोन्ही देशांनी आपापला दावा केला आहे. यामुळेच आतापर्यंत त्याच्याबद्दल नेहमीच वाद होत असतात.

एलओसी आणि एलएसीवरील वाढणाऱ्या कार्यवाही पाहता पाकिस्तान आणि चीनच्या करतुतीमध्ये तडजोड दिसून येते. हे योगायोग म्हणून नाकारता येत नाही. म्हणूनच सुरक्षा एजेन्सी या हालचालींवर बारकाईने नजर ठेवत आहेत. सर्वच सीमांवर अतिरिक्त दक्षता घेतली जात आहे.

चीनच्या सैन्याने लडाखमध्ये कमीतकमी ३ ठिकाणी भारतीय भूभाग परिसराचं उल्लंघन केले आहे. यात पेट्रोल पॉईंट १४ आणि रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या गोगरा पोस्ट स्थानाचा समावेश आहे. यातील प्रत्येक स्पॉटवर भारतीय हद्दीत ५०० हून अधिक चिनी सैन्य उपस्थित असल्याचे अहवालात म्हटले आहे.

भारतीय सैनिक बर्‍याच वर्षांपासून फिंगर ५ ते ८ यात गस्त घालत आहेत. तर चिनी सैनिक फिंगर ३ मधील भागात गस्त घालत आहेत. आता चीन फिंगर ३ ते ४ दरम्यान बंकर बांधत आहे, ज्याचा हेतू भारतीय सैनिकांना उर्वरित भागात प्रवेश करण्यापासून रोखणे आहे. चिनी सैन्याने डोंगराळ भागातही पोजिशन घेतली आहे.

माजी उप राष्ट्रीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एस. डी. प्रधान यांनी सांगितले की, पीओके आणि अक्साई चीन यांना परत मिळवण्याच्या भारतीय प्रयत्नांमुळे चीन-पाकिस्तानात तडजोड झाली आहे. ही दोन्ही क्षेत्रे सीपीईसी (चीन पाक इकॉनॉमिक कॉरिडोर) साठी महत्त्वपूर्ण आहेत.

तसेच, चीन आणि पाकिस्तान आता नेपाळचा वापर भारतावर दबाव वाढवण्यासाठी करीत आहेत. नेपाळने नुकताच एक नवीन नकाशा प्रसिद्ध करून भारतीय प्रांतांचा समावेश केला आहे आणि काळापाणी प्रदेश ताब्यात घेण्यास रणनीती आखत आहे. हेदेखील चीन-पाकच्या इशाऱ्यावर घडत असल्याचं त्यांनी सांगितले.

नियंत्रण रेषेवरील वाढत्या गोळीबारीच्या घटना, खोऱ्यात होणारे दहशतवादी हल्ले आणि एलएसीमध्ये चीनकडून भारतीय भागात घुसल्याच्या घटनांचा एकमेकांशी संबंध आहे. जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करुन, लडाखचं केंद्रशासित प्रदेश केल्यानंतर या सर्व घडामोडी घडत आहेत.

एलओसी आणि एलएसीवरील घटना कारगिल युद्धाची आठवण करून देतात. भारत कारगिलमध्ये पाकिस्तानचा मुकाबला करत होतं त्यावेळी चीनने पांगोंग तलावाच्या किनारी ५ किमी लांबीचा रस्ता तयार करण्यास सुरवात केली. एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धावर सैन्याचं फोकस असताना चीने याचा फायदा करुन घेतला.

त्यावरुन कोरोना संकट काळात अशाप्रकारे चीन, पाकिस्तान, नेपाळ यांच्याकडून भारताविरोधात कुरघोडी करण्याचा प्रयत्न एकाच वेळी होत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होतात.