Coronavirus: “मोदी सरकारने वेळीच पावले उचलली असती, तर कोरोनाचे सुमारे १ लाख मृत्यू टाळता आले असते”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 12:26 PM2021-07-29T12:26:22+5:302021-07-29T12:33:39+5:30

Coronavirus: भारतातील गंभीर स्थितीला मोदी सरकार प्रामुख्याने जबाबदार होते, असे म्हणणार नाही, असे अमेरिकन प्राध्यापिकेने म्हटले आहे.

देशभरात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असली, तरी तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकार तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना करताना दिसत आहेत.

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण हाच उत्तम उपाय असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे भारतासह जागतिक स्तरावरील सर्वच देश लसीकरणावर सर्वाधिक भर देत आहेत. भारतात तीन लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील महामारी विज्ञान आणि जागतिक सार्वजनिक आरोग्य या विषयांच्या प्राध्यापिका भ्रमर मुखर्जी यांनी भारतातील कोरोना परिस्थितीबाबत मोठे भाष्य केले आहे. एका वृत्त संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी डेल्टा व्हेरिएंट आणि निर्बंधामध्ये हस्तक्षेप करण्यास विलंब यांमुळे परिस्थिती काहीशी गंभीर बनली. तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोदी सरकारने वेळीच योग्य पावले उचलली असती, तर देशात १३ कोटी रुग्णांना कोरोनापासून वाचवता आले असते. तसेच १ लाख मृत्यू टाळता आले असते, असेही मुखर्जी यांनी म्हटले आहे.

दुसर्‍या लाटेच्या वेळी झालेल्या गंभीर स्थितीला मोदी सरकार प्रामुख्याने जबाबदार होते, असे म्हणणार नाही. मात्र, काही चुकांसाठी आम्ही सरकारला जबाबदारी आणि दोषातून मुक्त करू शकत नाही, असेही मुखर्जी यांनी सांगितले.

मोदी सरकारने मार्चच्या उत्तरार्धात लॉकडाऊन जाहीर केला असता, तर दररोजच्या रुग्णांमध्ये ४,१४,००० एवढी झालेली वाढ कमी करून २० हजार ते ४९ हजारवर आणता आली असती.

याच गतीने १५ एप्रिलपर्यंत अंदाजे २.६ दशलक्ष प्रकरणे टाळता आली असती. तर १५ मे पर्यंत जवळपास १२.९ दशलक्ष प्रकरणे टळली जाऊ शकता आली असती, असे मुखर्जी यांनी म्हटले आहे.

मार्चच्या मध्यापासून किंवा शेवटी लॉकडाऊन लावला असता तर ९७ हजार ते १ लाख ०९ हजारापर्यंत मृत्यू टाळता आले असते. थोडक्यात सांगायचे झाले तर मार्चमध्ये कोणत्याही वेळी कारवाई झाली असती, तर पुढील गंभीर परिस्थिती टाळता आली असती, असे त्या म्हणाल्या.

भारतामध्ये गेल्या २४ तासांमध्ये ४३ हजार ५०९ कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर याच काळात ३८ हजार ४६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रिकव्हरी रेटचा विचार केल्यास तो ९७.३८ टक्के आहे.

गेल्या २४ तासांत ६४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत देशातील ४३ लाख, ९२ हजार ६९७ जणांना कोरोनाविरोधातील लस मिळाली आहे. आतापर्यंत देशातील ४५ कोटी ०७ लाख ०६ हजार २५७ जणांचे लसीकरण झाले आहे.