बांगलादेशात तारिक रहमान मंत्रिमंडळातील एकमेव हिंदू मंत्री; कोण आहेत निताई रॉय चौधरी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 20:21 IST2026-02-17T20:11:23+5:302026-02-17T20:21:08+5:30
बांगलादेशाच्या १३ व्या संसदीय निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे नेते तारिक रहमान यांनी पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली आहे.

तारिक रहमान यांची आई खालिदा जिया यांच्या मंत्रिमंडळातही हिंदू मंत्र्यांचा समावेश होता. मात्र, तारिक रहमान यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात दोन अल्पसंख्याक चेहरे घेऊन आपल्या आईपेक्षा एक पाऊल पुढे टाकले आहे.

तारिक रहमान यांच्या २५ सदस्यांच्या मंत्रिमंडळात दोन अल्पसंख्याक नेत्यांना स्थान देऊन रहमान यांनी जागतिक स्तरावर एक सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये ज्येष्ठ हिंदू नेते निताई रॉय चौधरी आणि बौद्ध नेते दीपेन दीवान यांचा समावेश आहे.

निताई रॉय चौधरी हे बांगलादेशातील नामवंत वकील आणि कसलेले राजकारणी आहेत. १९४९ मध्ये जन्मलेले चौधरी हे बीएनपीच्या सर्वोच्च नेतृत्वाचे धोरणात्मक सल्लागार मानले जातात.

चौधरी यांनी मगुरा-२ या मतदारसंघातून 'जमात-ए-इस्लामी'च्या मुस्तर्शीद बिल्लाह यांचा ३०,८३८ मतांच्या फरकाने पराभव केला. त्यांना एकूण १,४७,८९६ मते मिळाली. चौधरी यांनी यापूर्वी हुसेन मुहम्मद इरशाद यांच्या सरकारमध्ये युवा आणि क्रीडा मंत्री म्हणून काम पाहिले आहे. सध्या ते बीएनपीचे उपाध्यक्ष आहेत.

निताई रॉय चौधरी बांगलादेशातील एक अत्यंत प्रतिष्ठित आणि वरिष्ठ वकील आहेत. त्यांनी कायद्याच्या क्षेत्रात प्रदीर्घ काळ काम केले असून ढाका बार असोसिएशनमध्ये ते सक्रिय राहिले आहेत. ते सध्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या मध्यवर्ती समितीचे उपाध्यक्ष आहेत. पक्षाच्या धोरणात्मक निर्णयात त्यांचा मोठा वाटा असतो.

शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या हल्ल्यांमुळे भारत आणि बांगलादेशातील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. निताई रॉय चौधरी यांची नियुक्ती भारतासाठी महत्त्वाची मानली जात आहे.

गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांवर भीषण हल्ले झाले. निवडणुकीच्या काळात हिंदूंना लक्ष्य करण्यात आले, ज्यामध्ये अनेक हत्या आणि मॉब लिंचिंगच्या घटना घडल्या. अशावेळी हिंदू मंत्र्यांची नियुक्ती करून तारिक रहमान आपल्या देशाची डागाळलेली प्रतिमा सुधारणार का? हा मोठा प्रश्न आहे.

















