CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात एक छोटीशी चूक ठरू शकते 'जीवघेणी', तज्ज्ञांचा खुलासा

By सायली शिर्के | Published: September 22, 2020 03:54 PM2020-09-22T15:54:01+5:302020-09-22T16:29:54+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या संकटात काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. एखादी छोटीशी चूकही जीवघेणी ठरू शकते.

कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला असून खबरदारीचे अनेक उपाय करण्यात येत आहेत. सोशल डिस्टंसिंग, मास्क, क्वारंटाईनच्या माध्यमातून योग्य ती काळजी घेतली जात आहे.

कोरोनाने देशात थैमान घातले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 55, 62,664 वर पोहोचला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 75,083 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 1,053 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 88,935 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या संकटात काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. एखादी छोटीशी चूकही जीवघेणी ठरू शकते.

वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे लोकांच्या मनातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डॉक्टरचा सल्ला घेण्याऐवजी अनेक जण हे आजारी पडल्यास मेडिकलमधून औषध घेतात.

डॉक्टरांच्या सल्लाशिवाय इतर कोणतीही औषधं घेणं हे जीवावर बेतू शकतं. योग्य वेळी उपचार न झाल्यास ते महागात पडण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी आरोग्याची उत्तमरित्या काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

कोरोना रुग्ण हे उपचारासाठी उशीरा दाखल होत आहेत. त्यामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाच्या काळात घाबरू नका, वेळीच योग्य उपचार करा असं डॉक्टरांनी म्हटलं आहे.

एम्सच्या मेडिसिन विभागाचे एसोसिएट प्रोफेसर डॉ. नीरज निश्चल यांनी कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क नक्की घाला. तसेच कोरोनाची लागण झाल्यास ते इतरांपासून लपवून न ठेवता लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

होम आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या व्यक्तीने आरोग्याची नीट काळजी घ्यावी. ताप आला अथवा श्वास घेण्यास त्रास झाला तर उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हा, ऑक्सिमीटरने शरीरातील ऑक्सिजन तपासा असं देखील निश्चल यांनी म्हटलं आहे.

लोकनायक रुग्णालयातील डॉ. सुरेश कुमार यांनी "कोरोनाच्या काही रुग्णांची अवस्था ही गंभीर आहे. त्यामुळे नियमांचं पालन करा. बेजबाबदारपणा योग्य नाही, सोशल डिस्टंसिंगचं पालन करा."

"कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर घाबरून जाऊ नका. घाबरून आणखी त्रास होण्याची शक्यता आहे. लक्षणं नसल्यास घराच्या मंडळींपासून थोडं वेगळं राहा, स्वत:ला आयसोलेट करून घ्या"

"कोरोनाची लागण झाल्यास शुगर, ब्लड प्रेशर, कॉलेस्ट्रॉल, डी-डाइमर हे देखील तपासणं गरजेचं आहे. तसेच होम आयसोलेशनच्या काळात वैद्यकीय सल्ला घ्या" अशी माहिती सुरेश कुमार यांनी दिली आहे.

देशात रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना अनेक दिलासादायक घटनाही समोर येत आहेत. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सहा महिन्यांपासून संपूर्ण देशात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना विषाणूच्या फैलावाचा जोर आता ओसरत असल्याचे दिसू लागले आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशभरात तब्बल एक लाख रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

सोमवारी दिवसभरात नव्या रुग्णांच्या संख्येतही मोठी घट दिसून आली आहे. दिवसभरात देशामध्ये कोरोनाचे 75 हजार 83 नवे रुग्ण सापडले आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे भारतामध्ये सोमवारी तब्बल एक लाख एक हजार 468 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 44 लाखांवर पोहोचली आहे.

44 लाख 97 हजार 867 लोकानी कोरोनावर मात केली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या घटून 9 लाख 75 हजारांहून अधिक आहे. देशात आतापर्यंत कोरोनाच्या संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी 80.12 टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.