रक्त, लघवीच्या माध्यमातून पसरत आहे कोरोना? पावसाळ्यात संसर्गाचा धोका किती; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 10:41 AM2020-05-31T10:41:56+5:302020-05-31T12:30:06+5:30

कोरोना व्हायरसच्या वाढत्या मुळे प्रभावामुळे जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. भारतात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. लॉकडाऊनच्या नियमांमध्येही काही प्रमाणात शिथिलता देण्यात आलेली आहे. एकिकडे तापमानाचा पारा वाढत चालला आहे. तर देशातील अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे.

अशा स्थितीत लोकांच्या मनात वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहेत. आकाशवाणीच्या कार्यक्रमातून दिल्लीतील आरएमल रुग्णालयातील प्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. एके वाष्णेय यांनी कोरोनाशीसंबंधीत काही प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. जेणेकरून लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण तयार होणार नाही.

अनेकदा शरीरावर लाल रंगाचे चट्टे येतात. फिट येणं किंवा मेदूशी संबंधीत समस्यांमुळे असं होऊ शकतं. कोरोना संक्रमणात अशी लक्षणं कमी दिसून आली आहेत. ९० टक्के लोकांना ताप, खोकला, सर्दी ही गंभीर लक्षणं दिसून आली आहेत.

पावसाळ्यात सर्दी, खोकला होणं ही खूपच सामान्य गोष्ट आहे. रायनोव्हायरस, इंफ्लुएंजा व्हायरस, कोरोना व्हायरसमुळे सर्दी, खोकला, ताप येऊ शकतो. काहीवेळा घश्यापर्यंत संक्रमण पोहोचतं. काही प्रमाणात कोरोनाची लक्षणं अशीच असतात. त्यामुळे प्रकृती बरी नसल्यास डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.

ज्यांना आधीपासूनच डायबिटीस, ब्लड प्रेशर, अस्थमा, एचआयव्ही, फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका आहे. किंवा ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी आहे. त्यांना संक्रमणाचा जास्त धोका असू शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या आजार असलेल्यांनी, वयस्कर लोकांनी, गर्भवती महिलांनी प्रकृतीकडे जास्त लक्ष द्यायला हवं.

बाहेर भाजी, दूध घेण्यासाठी जाताना मास्क घालून जाणं तसंच तोंडाला हात न लावणं फायद्याचं ठरेल. हात धुवून किंवा सॅनिटायजरचा वापर करून मगच तोंडाला स्पर्श करा.

फळ आणि भाज्या घरी आणल्यानंतर सॅनिटायजर लावण्याची गरज नाही. फक्त नळाच्या पाण्याने किंवा गरम पाण्याने स्वच्छ धुवा.

मुत्र आणि रक्त यांमुळे पसरतो का कोरोना?- आत्तापर्यंत लघवी किंवा रक्तामार्फत कोरोनाचा विषाणू पसरण्याचा एकही प्रकार समोर आलेला नाही. संक्रमित व्यक्तीच्या शिंकण्यातून, खोकण्यातून बाहेर येत असलेल्या ड्रॉपलेट्समार्फत हा आजार पसरत जातो. पण संक्रमित व्यक्तीची लक्षण दिसून येत नसल्यामुळे सावधानी बाळगणं गरजेचं आहे.