सणासुदीनंतर तिसऱ्या लाटेचा धोका किती? अन् शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर काय म्हणाले तज्ज्ञ वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 07:22 PM2021-10-21T19:22:29+5:302021-10-21T19:35:49+5:30

Corona Update In India: शाळा बऱ्याच कालावधीसाठी बंद असल्यानं विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता. तर सणासुदीनंतर देशात तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात आल्यानं देशात संभ्रमाचं वातावरण तयार झालं आहे. यावर आता तज्ज्ञांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. काय म्हणतायत तज्ज्ञ जाणून घेऊयात....

देशात अनेक राज्यांमध्ये आता शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण १८ वर्षाखालील मुलांसाठी अद्याप लस आलेली नसल्यानं आपल्या पाल्यांना शाळेत पाठवायचं की नाही याबाबत पालकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. त्यात सणासुदीच्या कालावधीनंतर देशात तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे नेमकं काय करायचं याचा संभ्रम पालकांसमोर निर्माण झाला आहे.

आरोग्य विषयक तज्ज्ञांनी मात्र पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवायला हवं असं मत व्यक्त केलं आहे. आई-वडिलांनी आपल्या पाल्यांची काळजी करण्याची गरज नाही. सणासुदीनंतर देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता फारच कमी आहे. त्यात लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रसार खूप कमी प्रमाणात होतो हे दिसून आलं आहे, असं सार्वजनिक आरोग्य विभागाचे तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत लहारिया यांनी सांगितलं आहे.

कोरोना रुग्णांची संख्या वाढली तरी लहान मुलांमध्ये त्याचं प्रमाण फार कमी असेल, असंही ते म्हणाले. सीरो सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार देशात जूनपर्यंत ६७.६ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी विकसीत झाल्याचं दिसून आलं आहे. इतकंच नव्हे, तर लहान मुलांमध्येही अँटीबॉडी आढळून आल्या आहेत. त्यामुळे चिंता करण्याचं कारण नसल्याचं डॉ. लहारिया म्हणाले.

देशात आता १०० कोटी नागरिकांना कोरोना विरोधी लसीचा एक डोस देखील देण्यात आलेला आहे. तसंच पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील निकालांचा अभ्यास करायचा झाल्यास तिसऱ्या लाटेची शक्यता फारच कमी आहे, असंही ते म्हणाले.

लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्याची खूप कमी प्रकरणं याआधीही समोर आली आहेत. लहान मुलांना इन्फेक्शन झालं तरी त्याची परिणामकारकता फार कमी असते. त्यात जर तिसरी लाट आलीच तर तिचा प्रभाव काही पहिल्या किंवा दुसऱ्या लाटेसारखा नसणार हे नक्की आहे. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवायलाच हवं. पालकांनी घाबरुन जाण्याची काहीच गरज नाही, असं डॉ. लहारिया म्हणाले.

डेन्मार्क, स्वीडनमध्ये शाळा बंद करण्यात आल्या नव्हता. इतकंच काय तर आता अमेरिकेतही पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवू लागले आहेत, असंही ते म्हणाले. भारतातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता १८ वर्षाखालील मुलांमध्ये लागण झाल्याची टक्केवारी फक्त २ ते ५ टक्क्यांध्येच राहिली आहे.

भारतात १८ वर्षाखालील लोकसंख्येचं प्रमाण जवळपास ४० टक्के इतकं आहे. वृद्ध व्यक्तींमध्ये लहान मुलांच्या तुलनेत गंभीर स्वरुपाचा आजार आणि मृत्यूची जोखमी १० ते २० पटीनं अधिक असते. जगात कोणत्याही ठिकाणाहून तिसऱ्या लाटेमुळे लहान मुलं प्रभावित होती असं एकही प्रकरण समोर आलेलं नाही, असंही डॉ. लहारिया म्हणाले.

शाळा कोरोना प्रतिबंधक नियमांचं काटेकोरपणे पालन करणार का याबाबत पालकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. सरकारनं शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होणार नाही यासाठी खास उपाययोजना करायला हव्यात तरच आम्ही मुलांना शाळेत पाठवू अशी भूमिका अनेक पालकांनी घेतलेली आहे. सरकारनं मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी पालकांच्या संघटनेनं केली आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, लहान मुलांचं लसीकरण अद्याप न होणं आणि कोविड नियमांचं काटेकोरपणे शाळांकडून पालन केलं जाईल का याबाबत पालकांमध्ये संभ्रमासोबतच भीतीचंही वातावरण आहे. यंदाच्या वर्षात तरी पालकांची मुलांना शाळेत पाठविण्याची तयारी नाही.

Read in English