सरकारच्या निर्णयामुळे दूर होईल का Vodafone-Idea वरील संकट?; जुलै महिन्यात गमावले १४ लाख युझर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 01:05 PM2021-09-24T13:05:27+5:302021-09-24T13:11:25+5:30

काही दिवसांपूर्वी सरकारनं दूरसंचार कंपन्यांना दिलासा देणारे निर्णय घेतले होते. कंपनीनं जुलै महिन्यात गमावले १४ लाख युझर्स. Jio, Airtel च्या ग्राहकांमध्ये मोठी वाढ.

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं दूरसंचार कंपन्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला होता. त्याचा सर्वाधिक फायदा व्होडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) या कंपनीलादेखील होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. तसंच कंपनी हळूहळू पुन्हा मार्गावर येईल असंही म्हटलं जात होतं.

असं असलं तरी व्होडाफोन आयडियाच्या ग्राहकांची संख्या सातत्यानं कमी होताना दिसत आहे. कंपनीनं जुलै महिन्यात आपले लाखो ग्राहक गमावले आहेत. टेलिकॉम कंपन्यांसाठी ग्राहकचं महसूलाचं मोठं साधन आहेत.

TRAI च्या अहवालानुसार जुलै महिन्यात व्होडाफोन आयडिया या कंपनीनं तब्बल १४.३० लाख ग्राहक गमावले असल्याची माहिती समोर आली आहे. जून महिन्यात ४२.८० लाख ग्राहकांनी व्होडाफोनला रामराम ठोकला होता.

अहवालानुसार जुलै महिन्यात रिलायन्स जिओनं ६५.१९ लाख नवे ग्राहक आपल्यासोबत जोडले आहेत. तसंच एअरटेलनंदेखील १९.४३ लाख युझर्स आपल्यासोबत जोडले आहेत. जून महिन्यात व्होडाफोन आयडियानं तब्बल ४२.८० लाख ग्राहक गमावले होते. तर रिलायन्स जिओनं आणि एअरटेलनं अनुक्रमे ५४.६६ लाख आणि ३८.१२ लाख नवे ग्राहक जोडले होते.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) नुसार जुलै महिन्यात रिलायन्स जिओच्या (Reliance JIO) ग्राहकांची संख्या तेजीनं वाढून ४४.३२ कोटीवर पोहोचली. तर एअरटेलच्या (Airtel) च्या ग्राहकांची संख्याही वाढून ३५.४० कोटी रूपयांवर पोहोचली. तर दुसरीकडे व्होडाफोन आयडियाच्या ग्राहकांच्या संख्येत घट होऊन आता ग्राहकांची संख्या २७.१९ कोटींवर पोहोचली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दूरसंचार क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. याचा फायदा सर्वच दूरसंचार कंपन्यांना होणार आहे.

AGR थकबाकीच्या संकटाचा सामना करणाऱ्या दूरसंचार कंपन्यांच्या हितासाठी सरकारनं काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. तसंच सरकारनं दूरसंचार कंपन्यांना ४ वर्षांचा मोरेटोरियमही दिला आहे.

गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी दूरसंचार क्षेत्रात १०० टक्के थेट परदेशी गुंतवणूकीला मंजुरी देण्यात आली आहे. तसंच भविष्यात स्पेक्ट्रमचा कालावधी २० वर्षांवरून वाढवून ३० वर्षे करण्यात आला आहे. तसंच भविष्यात लिलावात मिळवलेल्या स्पेक्ट्रम्सना १० वर्षानंतर स्पेक्ट्रम सरेंडर करण्याचीदेखील परवानगी दिली जाणार आहे.

एअरटेल ही कंपनी राईट इश्यूद्वारे तब्बल २१ हजार कोटी रूपये जमवणार आहे. कंपनीचा हा राईट इश्यू ५ ऑक्टोबरला खुला होईल. कंपनीनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार राईट इश्यूच्या पात्रतेसाठी २८ सप्टेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.

भारती एअरटेलच्या संचालक मंडळानं २९ ऑगस्ट रोडी राईट इश्यूद्वारे २१ हजार कोटी रूपये जमवण्यासाठी मंजुरी दिली होतीय ही रक्कम २३० रूपयांच्या प्रीमिअमसह ५३५ रूपये प्रति शेअर या दरावर जमवली जाईल. दरम्यान, संचालकांच्या विशेष समितीनं ५ ऑक्टोबरच्या तारखेला मंजुरी दिली आहे. तर हा राईट इश्यू २१ ऑक्टोबर रोजी बंद होईल.

Read in English