रोज फक्त 1 रुपयाची बचत करून बनवू शकता 15 लाखांचा मोठा फंड, कसा ते जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 05:55 PM2021-05-27T17:55:51+5:302021-05-27T18:06:05+5:30

sukanya samriddhi yojana : महिन्याला तीन हजार रुपये गुंतवल्यास तुम्हाला मुदतीनंतर 15 लाख रुपये मिळू शकतात.

नवी दिल्ली : आज आम्ही तुम्हाला एका सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही अगदी थोड्या पैशात गुंतवणूक करून भरमसाठ रक्कम जोडू शकता. या सरकारी योजनेचे सुकन्या समृद्धी योजना (SSY) असे नाव आहे.

या योजनेत दररोज एक रुपया इतकी किरकोळ बचत करून तुम्ही मोठी रक्कम साठवू शकता. प्राप्ती कर बचतीचाही लाभही या योजनेला मिळतो. दररोज एक रुपया जरी तुम्ही वाचवला तरी या योजनेत गुंतवणूक करणे शक्य आहे. महिन्याला तीन हजार रुपये गुंतवल्यास तुम्हाला मुदतीनंतर 15 लाख रुपये मिळू शकतात.

'बेटी बचाओ बेटी पढाओ' अभियानाअंतर्गत सरकारने ही अल्पबचत योजना (Small Saving Scheme) दाखल केली आहे. सर्वाधिक व्याजदर असणारी ही योजना आहे.

अवघ्या 250 रुपयांनी खाते उघडून या योजनेत गुंतवणूक करता येते. म्हणजेच तुम्ही दररोज एक रुपया जरी साठवला तरी महिन्याला 250 ते 300 रुपये यात भरू शकता. दर वर्षी किमान 250 रुपये भरणे आवश्यक आहे. तर कमाल दीड लाख रुपये यात भरता येतात.

सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 7.6 टक्के असून यावर प्राप्ती करातून सवलतीचा लाभही मिळतो. अगदी सुरुवातीला या योजनेचा व्याज दर तब्बल 9.2 टक्के इतका होता. या योजनेत गुंतवणूक सुरू केल्यानंतर आठ वर्षांनी मुलीच्या उच्च शिक्षणासाठी यातून 50 टक्के रक्कम काढता येते.

या योजनेत दरमहा तीन हजार रुपये गुंतवले तर वर्षाला 36 हजार रुपये गुंतवणूक होईल. 14 वर्षांनी 7.6 टक्के दराने चक्रवाढ व्याज पद्धतीने 9 लाख 11 हजार 574 रुपये मिळतील. तर 21 वर्षांच्या मॅच्युरिटीवर तब्बल 15 लाख 22 हजार 221 रुपये मिळतील. यात 7.6 टक्के दराने मिळणारे व्याज करमुक्त आहे.

सुकन्या समृद्धी योजनेचे खाते पोस्टाच्या कोणत्याही शाखेत उघडता येईल. दहा वर्षे वयापर्यंतच्या मुलीच्या नावे हे खाते उघडता येते. किमान 250 ते कमाल दीड लाख रुपये एका वर्षात भरता येतात.

सुकन्या समृद्धी योजनेतील खाते तुमची मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत किंवा 18 वर्षांची झाल्यानंतर तिचे लग्न होईपर्यंत तुम्हाला हे खाते सुरू ठेवता येते.

या योजनेत दरवर्षी किमान 250 रुपये भरावे लागतात. ते भरले नाहीत तर खाते बंद होते. खाते पुन्हा सुरू करण्यासाठी दरवर्षी 50 रुपये दंड भरून खाते पुन्हा सुरू करता येते. 15 वर्षांपर्यंत खाते बंद पडल्यास पुन्हा सुरू करण्याची सुविधा मिळते.